म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वैजापूर तालुक्यातील सरलाबेट संस्थान येथे गुरुपोर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाने गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनावरशेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
संस्थानचे प्रमुख रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन याविषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, 'नॉन बीटी कापूस बीटी कापसाच्या भोवती लावा. गुलाबी बोंडअळीच्या पंतगापासून पुढे १०० ते २०० अळया निर्माण होत असल्याने अळी अवस्थेपेक्षा पंतग मारल्यास तेवढया अळया निर्माणच होणार नाहीत. पंतग हे कामगंध सापळा किंवा प्रकाश सापळयाने मारणे सहज शक्य आहे. तथापी अळी पात्यात किंवा सरंक्षक आवरणात गेली की ती मारणे कठीण जाते म्हणून फुलोरा येण्यापूर्वी तत्काळ आजच प्रकाश व कामगंध सापळा लावावा. गोळा झालेले पंतग नष्ट केल्यास या किडीवर वेळेवर मात होऊन पुढे किडीची संख्या कमी होईल.' यावेळी अधिकारी संजय व्यास, विस्तार अधिकारी गजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.