म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादेत दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रतिसाद मिळेल, या आशेपोटी कोकणातून हापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढविल्यामुळे परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला, परंतु आता शिल्लक हापूसची लवकर विक्री शक्य नाही. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे हापूस उत्पादक शेतकरी निलेश चव्हाण यांनी सांगितले.
राज्य कृषी पणन मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यातर्फे जाधववाडी येथील बाजार समिती आवारात गेल्या दोन वर्षांपासून आंबा महोत्सव केला जात. नैसर्गिकरित्या पिकविलेला हापूससह केशर आंब्याची चव चाखण्याची संधी यानिमित्ताने ग्राहकांना मिळाली. शेतकरी व ग्राहक यांच्या कोणीही मध्यस्थी नसल्याने परवडणाऱ्या दरात आंब्याची विक्री या महोत्सवात झाली होती. यंदा करोना विषाणू संसर्गाचे संकट असल्यामुळे महोत्सवाचे आयोजन झाले नाही, पण दरवर्षी ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद पाहात कोकणातील दोन हापूस उत्पादक शेतकरी हापूस आंबा विक्रीसाठी चार दिवसापूर्वी येथे दाखल झाले. त्यांनी आंब्याच्या १२५ पेट्या आणल्या होत्या. त्यापैकी १०५ पेट्याची विक्री झाली, परंतु आता येत्या २० मेपर्यंत 'लॉकडाऊन'ची कठोर अंमलबजावणीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे उर्वरित हापूस आंबा वेळेत होणे अशक्य आहे. सर्व आंबे आता तयार झाल्याने तो जास्त वेळे ठेवता येणे शक्य नाही. कोकणाकडे परत जाताना वाटेत शक्य झाल्यास हापूस विक्री करू, अशी माहिती हापूस उत्पादक शेतकरी चव्हाण यांनी दिली. ते रविवारी गावाकडे परतीचा प्रवासासाठी रवाना झाले.