म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळ स्थापन होण्यापूर्वी मराठवाडा वक्फ बोर्ड हे औरंगाबादेत कार्यान्वित होते. त्यामुळे वक्फ बोर्डाचे मुख्यालय मुंबईला नेण्याचा घाट कशासाठी घातला जात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. औरंगाबाद हे शहर राज्यातील नागरिकांसाठी अधिक सोयीचे असल्याने कार्यालय औरंगाबादेतच ठेवावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
औरंगाबाद शहरातील वक्फ बोर्डाचे मुख्यालय मुंबई येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय वक्फ बोर्डाच्या मुंबईत येथे ११ व १२ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. बोर्डाच्या काही सदस्यांनी मुख्यालय मुंबई येथे स्थलांतरित करण्याची मागणी केल्याने हा निर्णय घेम्यात आला. मुख्यालयाच्या स्थलांतराचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. शासनाकडून जागा मिळाल्यानंतर कार्यालय स्थलांतरित होईल. मात्र, वक्फ बोर्डाचे मुख्यालय औरंगाबादेच ठेवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
……
औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाचे मुख्यालय मुंबईला नेणे हे संयुक्तिक होणार नाही. दर्गा, मशिदींशी संबंधित नागरिकांना मुंबईला जाऊन काम करून घेणे जिकिरीचे ठरणार आहे. वक्फ बोर्डाच्या मालमत्ता मराठवाड्यात जास्त आहेत. शिवाय औरंगाबाद शहर हे राज्यातील नागरिकांना सुविधायुक्त आहे.
-इम्तियाज जलील, खासदार
………
वक्फ बोर्डाच्या सर्वाधिक मालमत्ता मराठवाड्यात असल्याने मुख्यालय औरंगाबाद येथेच राहावे. हे कार्यालय मुंबई येथे नेण्याच्या उद्देशाबद्दल शंका घेतली जात आहे. यासाठी 'एमआयएम'तर्फे जनआंदोलन उभे केले जाणार आहे.
-शेख अहेमद, जिल्हाध्यक्ष, एमआयएम
औरंगाबाद येथे १९६० पासून वक्फ बोर्डाचे मुख्यालय आहे. २००७ मध्ये राज्य वक्फ महामंडळ स्थापन करण्यात आले. आता महामंडळात इतर भागातील सदस्य नियुक्त झाले आहेत. हा निर्णय त्यांनी घेतला आहे. मुंबईत बसून हे सदस्य काय निर्णय घेतील, याची माहिती मिळणार नाही. त्यामुळे मुख्यालय औरंगाबादलाच ठेवावे.
-शेख फैसल, प्रदेशाध्यक्ष, ऑल इंडिया उलेमा बोर्ड
…………
औरंगाबाद शहरात वक्फ बोर्डाचे मुख्यालय खूप वर्षांपासून आहे. मराठवाड्यात वक्फच्या जमिनी जास्त आहे. तसेच सर्वाधिक नोंदणीही मराठवाड्यात आहे. मुख्यालय औरंगाबादहून मुंबई येथे घेऊन जाऊ नये. याचा फटका वक्फ बोर्डाशी संबंधित नागरिकांना बसणार आहे.
-हमद चाऊस, प्रदेश सचिव, काँग्रेस
औरंगाबादचे मुख्यालय मुंबईला नेऊन करणार काय? हे कार्यालय औरंगाबादलाच राहू द्यावे. या ठिकाणी कर्मचारी भरती करावी. तसेच वक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेप्रमाणे वक्फ बोर्डाला स्वतंत्र पोलिस दल द्यावे. त्यामुळे वक्फ बोर्ड अधिक सक्षम होईल.
-मोबीन अन्सारी, आझाद युवा ब्रिगेड
मुख्यालय मुंबई येथे नेण्याचा प्रयत्न यापूर्वीही करण्यात आला होता. त्याला आम्ही विरोध केल्याने तो रद्द झाला. आता पुन्हा घेतलेला निर्णय अन्यायकारक व नागरिकांसाठी गैरसोयीचा आहे. बोर्डाने आधीच विभागीय कार्यालये मुख्यालयातच स्थलांतरित करून सर्वसामान्यांचे हाल केले आहेत. आता मुंबई येथे मुख्यालय नेल्यानंतर गरीब व्यक्तीला तेथे जाणे व राहणे अशक्य होईल. बोर्ड सशक्त करण्याऐवजी मुख्यालय हलविण्याचा निर्णय अयोग्य आहे.
-सय्यद जमील, माजी वक्फ बोर्ड सदस्य, जालना