म. टा. प्रतिनिधी, कन्नड
पिसाळलेल्या कुत्र्याने कन्नड नगर पालिकेच्या आरोग्य सभापती विद्या काशीनंद यांना चावा घेतला. कन्नड शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, शालेय विद्यार्थी, महिला व पदचारी भयभीत झाले आहेत.
अरोग्य सभापती विद्या काशीनंद गुरुवारी (१२ डिसेंबर) सकाळी साडेसातच्या सुमारास मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना घरासमोरच पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्या पायास चावा घेऊन जखमी केले. सभापती विद्या काशीनंद यांनी यापूर्वीच, नगर पालिकेच्या सभेमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांत विशेष करून माहिलामध्ये भटक्या, पिसाळलेल्या कुत्र्यांची धास्ती बसली आहे. यापूर्वी काही शाळकरी मुलांना कुत्र्याने चावा घेतला आहे. तात्काळ या कुत्र्यांवर आवर घालण्याची मागणी मुख्याधिकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. काशीनंद या स्वतः शिक्षण व आरोग्य सभापती असल्याने त्यांनी याबाबत वेळोवेळी मुख्याधिकाऱ्यांना लेखी व तोंडी सूचना दिल्या, मात्र त्याकडे मुख्याधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.
औरंगाबादेतील कुत्री कन्नड शहरात शहर व परिसरात औरंगाबाद येथील पकडलेली कुत्री रात्री बेरात्री आणून सोडली जातात. अचानक कुत्री कशी वाढतात, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. कुत्र्यांमुळे कामानिमित्त बाहेर पडायची भीती आहे. बाहेर पडल्यास आणि कुत्रा चावला तर लस उपलब्ध असेलच, याची शाश्वती नसते. लस उपलब्ध नसेल तर औरंगाबादला जाऊन उपचार घ्यावे लागतात. यामुळे वेळ, पैसा, नाहक त्रास, मनस्ताप सहन करावा लागत आहे.