म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व हॉटेल, पानटपऱ्या, देशी व विदेशी मद्यविक्रीची दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता दुकान, मॉल्स, हॉटेल, तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने व पानटपऱ्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी मद्य, बिअर विक्री २० मार्च संध्याकाळी सहा वाजेपासून ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. करोना संसर्ग टाळण्यासाठी वापरण्यात येणारे फेस मास्क, हँडवॉश, सॅनिटायझर आदी साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. रविवारी जनता कर्फ्यू म्हणून पाळण्याचे आवाहन जनतेस केले असून जिल्ह्यातही सर्व जनतेने सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत घराबाहेर न पडता जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
\Bआधार केंद्र बंद \B
अधिकची खबरदारी व नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आधार केंद्र ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
\Bजप्त केलेले मास्क, सॅनिटायझर आरोग्य विभागाला\B
फेस मास्क, हँडवॉश लिक्वीड, सॅनिटायजर्सचा औरंगाबाद जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवैध साठा जप्त करण्यात आला होता. या जप्त केलेल्या या साठ्यापैकी उत्तम प्रतीचे व उपयुक्त फेस मास्क, हँडवॉश लिक्वीड, सॅनिटायजर्स आरोग्य विभागास सुपूर्द करण्यात येणार आहेत.
\B'स्टॉक'साठी तळीरामांची गर्दी\B
जिल्हा प्रशासनाने देशी, विदेशी मद्यविक्री बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आता जिल्ह्यात सलग ११ दिवस 'ड्राय डे' राहणार आहे. प्रशासनाने निर्णय घेताच शुक्रवारी सहा वाजेपूर्वी तळीरामांनी आपला 'स्टॉक' घेऊन ठेवण्यासाठी मिळेल त्या वाइन शॉपवर मोठी गर्दी केली.