म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सर्वाधिक दम्याच्या रुग्णांमध्ये भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, तर महाराष्ट्र हे तिसऱ्या क्रमांकाचे राज्य असल्याचे पुरते स्पष्ट झाले आहे. एकट्या भारतामध्ये ३४ लाख दम्याच्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि औरंगाबाद शहरामध्ये केवळ एका वर्षात ६ टक्क्यांनी दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचेही समोर आल्याचे श्वसनविकारतज्ज्ञांनी मंगळवारी (१७ डिसेंबर) पत्रकार परिषदेनिमित्त सांगितले.
एका कंपनीच्या उपक्रमाअंतर्गत ही पत्रकार परिषद घेण्यात आली. याच कंपनीने दम्यासंदर्भात राबविलेल्या उपक्रमामुळेच १४ टक्के व्यक्तींमध्ये जनजागृती निर्माण झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या प्रसंगी शहरातील श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. व्यंकटेश देशपांडे म्हणाले, जगभरात चीननंतर भारतामध्ये सर्वाधिक दम्याचे रुग्ण आहेत आणि महाराष्ट्र हे दम्याच्या रुग्णांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचे राज्य असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये ३४ लाख दम्याच्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि हे प्रमाण आणखी वाढू शकते, अशीही शक्यता नाकारता येत नाही. औरंगाबाद शहरातही केवळ एका वर्षात सहा टक्के दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे आणि हे शहरातील बहुतांश श्वसनविकारतज्ज्ञांचे निरीक्षण आहे. शहरातील वाढत्या धूळ, धूर, वाहनांच्या प्रदूषणामुळे तसेच पर्यावरण स्थिर नसल्यामुळेच दम्याचे अटॅक येण्याचे प्रमाण शहरात वाढल्याचे दिसून येत आहे. श्वसनविकारांकडे उपचारासाठी येणारा प्रत्येक तिसरा किंवा चौथा रुग्ण हा दम्याचा असतो, तर सर्वसाधारण रुग्णालयात येणारा आठवा किंवा नववा रुग्ण हा दम्याचा असतो, असेही आढळून येत असल्याचे डॉ. देशपांडे म्हणाले. मुलांध्येही दम्याचे प्रमाण वाढत असून, मुलांमधील वाढत्या स्थुलतेमुळे तसेच खाद्य संस्कृती बिघडल्यामुळेही दम्याचे प्रमाण काहीअंशी वाढत असल्याचे बालरोग श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. विष्णू कदम म्हणाले.
\B'इन्हेलर थेरपी'ने करता येते मात
\Bदम्यावर 'इन्हेलर थेरपी' ही जगमान्य व सर्वांत प्रभावी उपचार पद्धती असल्याचे सिद्ध झाले आहे. ही थेरपी वेळीच सुरू केली व योग्य पद्धतीने तिचा वापर केला तर दम्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे शक्य आहे. दमा हा पूर्ण बरा होणारा आजार नसला तरी तो नक्कीच पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो. बालदम्याच्या रुग्णांवर वेळीच थेरपीचे उपचार सुरू झाले तर मुलांची सर्वांगीण वाढ होणे शक्य होते. दमा असला तरी योग्य उपचारांनी सर्वसामान्य आयुष्य जगणे सहज शक्य होते, असेही डॉ. देशपांडे यांच्यासह डॉ. कदम यांनी सांगितले.