म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पावसाळ्यापूर्वी आवश्यक असणारी सर्व कामे वेळेत पूर्ण करातील. जिल्ह्यातील रस्ते, पुलांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले.
जिल्हाधिकारी चौधरी यांनी मान्सूनपूर्वी करायची सर्व कामे, खबरदारी, आवश्यक साधन सामग्री, बचाव साहित्य आदींबाबत बैठकीत सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले, अपर पोलिस अधीक्षक गणेश गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजोय चौधरी आदींसह वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्व अधिकारी, तहसीलदार, नगर पालिकांचे मुख्याधिकारी यांची 'ऑनलाइन'च्या माध्यमातून बैठकीत उपस्थिती होती.
बैठकीमध्ये आपत्ती व्यवस्थापनात बचाव साहित्य व शोध साहित्य याचाही आढावा घेण्यात आला. तालुकास्तरावर आवश्यक असणाऱ्या साधन सामग्रीची मागणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडे लगेचच करावी, अशा सूचनाही चौधरी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना दिल्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील रस्ते, पूल यांची तपासणी करून तसा अहवाल सादर करण्यात यावा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने आपत्तीजनक परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक असणाऱ्या पथक प्रमुखांची नियुक्ती करावी. ग्रामपंचायत स्तरावर जिल्हा परिषदेने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन दूषित पाण्याचा पुरवठा होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. महावितरण कंपनीने दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश दिले; तसेच त्यांनी गंगापूर, वैजापूर आणि पैठण येथील बोटींची सद्यस्थिती आणि अपेक्षित कार्यवाहीबाबतही निर्देश दिले. यासोबत तालुकास्तरावरील रस्त्यांची स्थिती तपासून पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्यांबाबत योग्य ती कार्यवाही करावी. तालुकास्तरावर मान्सून पूर्व तयारी बैठक घेण्यात यावी. जलतरणपटू, मदतीसाठी धावून येणारे स्वयंसेवक आदींची मुख्य संपर्क यादी तयार ठेवावी. दैनंदिन पर्जन्यमान योग्य आणि वेळेत घेण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी चौधरी यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
\Bमहापालिकेचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष\B
पावसाळ्यात महापालिका प्रशासनाने स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा; तसेच रस्त्यावरील 'मॅनहोल' बुजवण्याचे काम तातडीने करावे. शहरातील धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीस बजावण्यात याव्यात, असेही जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितले.