म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिसांकडून चोरीचा आरोप करण्यात आलेल्या आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (लोहमार्ग) पी. एच. जोशी यांनी दोषमुक्त केले. पोलिसांच्या ताब्यात असताना आरोपीवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे व त्यामुळे पोलिसांचे म्हणणे विश्वास ठेवण्यासारखे नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्याला दोषमुक्त केले.
पोलिसांनी २१ मार्च २०१२ रोजी सकाळी पावणेसहाला आरोपी गौतम भीमराव किर्तने (रा. पेडगाव, जि. परभणी) याला रेल्वेची केबल वायर चोरी करताना परभणी रेल्वेस्थानकाजवळ पकडले व वायर जप्त करण्यात आले. त्याचा जप्ती पंचनामा तयार केला व आरोपीची कबुली जबाब नोंदवला. त्याचदिवशी दुपारी त्याला शहरातील रेल्वे न्यायालयात आरोपीला हजर केले, असे फिर्यादी पक्षाचे कथन होते. प्रकरणातील फिर्यादी पोलिस अधिकारी यांनी त्यांच्या उलट तपासात मान्य केले की घटनेच्या एक दिवस आधी म्हणजेच २० मार्च २०१२ रोजी त्यांना आरोपीचा ताबा मिळाला होता. तेव्हापासून आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात होता व त्यामुळे आरोपीला दुसऱ्या दिवशी सकाळी चोरी करण्याची संधी नव्हती. साक्षी-पुराव्यानंतर आरोपीने प्रकरणातून दोषमुक्त करण्यासाठीचा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. प्रकरणात आरोपीच्या बाजुने अॅड. अक्षय राडीकर यांनी बाजू मांडली.