म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'भाषा ही मूळातच कवितेच्या रुपात जन्माला आली. प्रत्येक माणूस संवेदनशील असल्यामुळे त्याला कविता जवळची वाटते. पूर्वी कविता लिहिण्याला बंधने होती. परंतु, आताची कविता मुक्तछंदात असल्यामुळे ती लोकप्रिय झाली आहे. सध्या कवितेला सवंग रुप येत असून कविता चांगली येण्यासाठी रसिकता जपली पाहिजे,' असे प्रतिपादन समीक्षक डॉ. समिता जाधव यांनी केले.
देवगिरी महाविद्यालय, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, देवगिरी आयटीएमएस, शिवछत्रपती महाविद्यालय, जयप्रकाश नारायण अध्यापक महाविद्यालयाच्या वतीने विनायकराव पाटील स्मृती समारोहानिमित्त आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला स्पर्धा समन्वयक प्रा. रवींद्र पाटील, पर्यवेक्षक सुरेश लिपाने, डॉ. वैजनाथ कदम, डॉ. जिजा शिंदे उपस्थित होते. यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ. समिता जाधव यांनी मार्गदर्शन केले. 'कविता प्रथम आपल्या मनात रुजवता आली पाहिजे. जगातील क्रांती कवितेच्या माध्यमातून झाली. कविता ही समाजाला दिशा देण्याचे कार्य करते. संत तुकारामांची विद्रोही परंपरा आजही चालू आहे,' असे जाधव म्हणाल्या. दुसऱ्या सत्रात स्पर्धक विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, शेती, स्त्री वेदना या विषयातून समकालीन परिस्थितीचे दाहक वास्तव मांडले. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. रमेश रावळकर, डॉ. राजश्री पवार आणि भास्कर निर्मळ पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रवी काळे यांनी केले.