म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गावकऱ्यांची मदत आणि शिक्षकांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर केसापुरी जिल्हा परिषद शाळेला नवसंजीवनी मिळाली. ही शाळा वर्षभरापूर्वी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती.
या शाळेत २०१८-१९ मध्ये विद्यार्थी संख्या २२ होती. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने ही शाळा बंद का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली. शाळा बंद पडू नये, यासाठी शिक्षकांनी हालचाली सुरू केल्या. मुख्याध्यापक विजयकुमार गेडाम, सहशिक्षक रवी जाधव यांनी प्रयत्न सुरू केले. केवळ पटसंख्येचा प्रश्न राहिला नव्हता. शाळेच्या परिसरात जनावरांचा मुक्त संचार, वाहनांची ये-जा सुरू असल्याने शाळेची शांतता भंग पावली होती. शाळेचे पटांगण म्हणजे रहदारीचा रस्ता झाला होता. शाळेला संरक्षक भिंत नाही, गेट नाही, परिसरात एकही झाड नाही, स्वच्छतागृहावर करवंदाची जाळी, शाळेचा रंग उडालेला, पिण्यासाठी पाणी नव्हते, शाळा व अंगणवाडी यामधून जाणारी बरोबर दोन फुटाची सांडपाण्याची नाली. ही सर्व अवस्था बघून शाळा आहे काय? असा प्रश्न पडला.
सरपंच शांताराम वाहुळ, उपसरपंच प्रधान जाधव, माजी सरपंच रामनाथ सुरोशे, ज्ञानेश्वर पवार, धोंडिराम निकम तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, पालक, गावकरी यांच्याशी रवी जाधव यांनी संपर्क साधला. गावकऱ्यांनी शाळेसाठी हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यामध्ये माजी सरपंच रामनाथ कडुबा पाटील सुरासे यांनी सढळ हाताने सर्वप्रथम शाळेला सहा हजारांची मदत केली. त्यातून गेट, शाळेच्या मागील बाजूस ५० फूट रुंदीचे तारेचे कुंपण केले. पहिल्या वार्षिक स्नेहसमेलनास पाच हजारांचा निधी, शाळेस पाच फुटी नारळाची १५ झाडे, एक विद्यार्थी दोन झाड याप्रमाणे ७० औषधी झाडे गेल्यावर्षी दिली. त्यांच्या सहकार्यामुळे खरोखर शाळेला एकाप्रकारे संजीवनी प्राप्त झाली.
शाळेच्या खात्यावर असलेल्या दुरुस्ती निधीमधून प्रथम सांडपाण्याची भूमिगत व्यवस्था व पाण्याची व्यवस्था आदी मुख्याध्यापक, शालेय समिती अध्यक्ष, सर्व सदस्य यांनी केली. ग्रामपंचायतीकडून विनामूल्य नळजोडणी करून देण्यात आली. शाळेने पहिले वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले. तेव्हा रामनाथ पाटील सुरासे यांनी दिलेल्या पाच हजारांच्या मदतीमुळे वार्षिक स्नेहसंमेलन जोमात पार पडले आणि तब्बल बारा हजार रुपये बक्षिसांचा वर्षाव झाला. उपलब्ध झालेल्या रक्कमेचा उपयोग संपूर्ण शाळेची रंगरंगोटी करण्यात आला. या सर्व प्रयत्नामुळे शाळेचा कायापालट झाला आहे.
\Bअधिकाऱ्यांकडून शाबासकीची थाप\B
यात भर टाकत दोन्ही शिक्षकांनी ज्ञानरचनावाद प्रमाणे शिक्षण, सहशालेय उपक्रम, डिजिटल क्लासरूम, शाळेमध्ये आयोजित विविध क्रीडा स्पर्धा, आनंदनगरी, परिसर सहल, वन भोजन, जयंती व पुण्यतिथीचे आयोजन, आनंददायी शिक्षण, विद्यार्थ्यांचे वाढदिवस, हसत खेळत शिक्षण यामुळे विद्यार्थी रमून शाळेचा पट २२वरून ३५ झाला. पालकांचा विद्यार्थ्यांकडे आणि शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. अध्ययनस्तर निश्चितीमध्ये केसापुरी शाळा अव्वल आली. गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक यांना शाळेस व शिक्षकांना शाबासकीची थाप द्यावी लागली आहे.