Nikhil.Nirkhee@timesgroup.com
Tweet : @nnirkheeMT
औरंगाबाद ः अवघ्या सव्वा वर्षात औरंगाबाद शहरात १२ ब्रेन डेड व्यक्तींच्या अवयवांचे दान करण्यात आले. दात्यांच्या हृदय, यकृत, नेत्र, मूत्रपिंड या अवयवांच्या माध्यमातून सुमारे ५० व्यक्तींना जीवनदान; तसेच दृष्टिदान मिळाले. या अवयवदानामध्ये अर्थातच सर्वाधिक प्रमाणात किडनीदान झाले आणि तब्बल २३ व्यक्तींवर मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण झाले. विशेष म्हणजे यातील एका ब्रेन डेड दात्याच्या माध्यमातून एका रुग्णावर दुसऱ्यांदा मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण यशस्वी झाले. त्यातच सुखद बाब म्हणजे शहरामध्ये दुसऱ्यांदा तसेच तिसऱ्यांदा प्रत्यारोपणाच्या ५०पेक्षा जास्त केसेस आहेत आणि यातील अनेक केसेस यशस्वी ठरल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.
कोणत्याही व्यक्तीचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपण हेच दोन पर्याय शिल्लक राहतात. यातील डायलिसिस हा तात्कालिन उपचार ठरतो, तर प्रत्यारोपण हा दीर्घकालीन पर्याय ठरतो. प्रत्यारोपणानंतर संबंधित व्यक्तीचे जीवनमान हरतऱ्हेने उंचावते, असे वैद्यकतज्ज्ञ म्हणतात. प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती आपले स्वतःचे काम-व्यवसाय-नोकरीदेखील करू शकतात आणि आज अशा व्यक्ती सर्वत्र मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र वेगवेगळ्या कारणास्तव काहींचे प्रत्यारोपित केलेले मूत्रपिंड निकामी होऊ शकते आणि अशा व्यक्तीपुढे पुन्हा डायलिसिस किंवा दुसऱ्यांदा प्रत्यारोपणाचा पर्याय राहतो. अशा स्थितीनंतर एकाच व्यक्तीवर दुसऱ्यांदा प्रत्यारोपण झालेल्या शहरामध्ये सुमारे ५० केसेस आहेत, तर तिसऱ्यांदा प्रत्यारोपण झालेल्या किमान २ ते ३ केसेस आहेत. दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा प्रत्यारोपणाच्या सर्वाधिक ४७ पेक्षा जास्त केसेस यशस्वीपणे हाताळलेले शहरातील ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सुहास बावीकर हे ‘मटा’शी संवाद साधताना म्हणाले, मागच्या २८ वर्षांत मी शहरामध्ये किडनी प्रत्यारोपणाच्या ११०० पेक्षा जास्त केसेस केल्या आहेत. यामध्ये दुसऱ्यांदा प्रत्यारोपणाच्या ४५-४६ केसेस, तर तिसऱ्यांदा प्रत्यारोपणाच्या २ ते ३ केसेसचा समावेश आहे. दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदादेखील प्रत्यारोपण यशस्वी होऊ शकते आणि शहरामध्ये अशा केसेस नक्कीच वाढत आहेत.
तीन कारणांमुळे किडनीची वाट
एकूण तीन कारणांमुळे पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा प्रत्यारोपित केलेली किडनी निकामी होऊ शकते. यामध्ये पहिले कारण ठरते ते ‘रिजेक्शन’चे; म्हणजेच मूळ शरीर प्रकृती प्रत्यारोपित किडनी स्वीकारत नाही आणि शरीराच्या मूलभूत प्रतिकारशक्तीमुळे प्रत्यारोपित किडनी निकामी होऊ शकते. प्रत्यारोपित किडनी निकामी होऊ नये म्हणूनच ‘इम्युनोसप्रेशन’च्या गोळ्या संबंधित रुग्णाला दिल्या जातात व शरीराची प्रतिकारशक्ती शून्यावर आणून यथावकाश हळूहळू वाढवली जाते. मात्र ‘इम्युनोसप्रेशन’च्या गोळ्या बंद केल्या किंवा कमी केल्या किंवा अनियमित घेतल्या की पुन्हा प्रतिकारशक्ती वाढून प्रत्यारोपित किडनी निकामी होण्याचा धोका वाढत जातो. त्याचबरोबर, पुन्हा मूळ आजार उद्भवणे किंवा डोके वर काढणे, हे किडनी निकामी होण्याचे दुसरे कारण आहे, तर जंतुसंसर्ग हे किडनी निकामी होण्याचे तिसरे कारण आहे. अर्थात, तिन्ही कारणे तेवढीच महत्वाची आहेत, असेही डॉ. बावीकर म्हणाले.
दुसरे-तिसरे प्रत्यारोपण अवघड
दुसऱ्यांदा तसेच तिसऱ्यांदा केली जाणारी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया नक्कीच जास्त आव्हानात्मक असते आणि यामध्ये शल्यचिकित्सकाचे कसब पणाला लागते. दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा प्रत्यारोपणानंतर ‘इम्युनोसप्रेशन’च्या औधांचा डोस हा जास्त तीव्र स्वरुपात व अधिक प्रमाणात द्यावा लागू शकतो. अर्थात, जास्त तीव्र डोस दिल्यास प्रतिकारशक्ती अत्यल्प होऊन जंतुसंसर्गाची भीती वाढते व त्याचवेळी जंतूसंसर्ग होऊ नये म्हणूनही रुग्णाला जपावे लागते. एक प्रकारे ही तारेवरची कसरत असते. अर्थात, योग्य काळजी घेतली व औषधे-गोळ्या घेण्यात निष्काळजीपणा नाही केला, तर प्रत्यारोपण यशस्वी होऊ शकते, असे मूत्रमार्ग शल्यचिकित्सक डॉ. अभय महाजन यांनी ‘मटा’ला सांगितले. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्येही दुसरे-तिसरे प्रत्यारोपण शक्य असल्याचे मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सचिन सोनी म्हणाले.
हो, मी गोळ्या बंद केल्या होत्या
माझ्यावर २००९मध्ये पहिल्यांदा किडनी प्रत्यारोपण झाले होते व आईनेच किडनीदान दिले होते. मात्र दोन मुले, कुटुंबाचा खर्च जास्त, आर्थिक चणचण, यामुळे तब्बल चार महिने गोळ्या घेतल्या नाही व नेमकी त्यानंतर प्रत्यारोपण केलेली किडनी निकामी झाली व पुन्हा डायलिसिसवर यावे लागले. सुदैवाने, अवयवदानातून दुसऱ्यांदा किडनी मिळाली व पुन्हा एकदा मी आयुष्यात उभा राहात आहे, असे ३ मे रोजी शहरामध्ये दुसऱ्यांदा प्रत्यारोपण झालेला रुग्ण व हाडोळती (ता. अहमदपूर, जि. लातूर) ग्रामपंचायतचा सदस्य अनिल तोंडचिरकर यांनी ‘मटा’ला सांगितले.
Tweet : @nnirkheeMT
औरंगाबाद ः अवघ्या सव्वा वर्षात औरंगाबाद शहरात १२ ब्रेन डेड व्यक्तींच्या अवयवांचे दान करण्यात आले. दात्यांच्या हृदय, यकृत, नेत्र, मूत्रपिंड या अवयवांच्या माध्यमातून सुमारे ५० व्यक्तींना जीवनदान; तसेच दृष्टिदान मिळाले. या अवयवदानामध्ये अर्थातच सर्वाधिक प्रमाणात किडनीदान झाले आणि तब्बल २३ व्यक्तींवर मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण झाले. विशेष म्हणजे यातील एका ब्रेन डेड दात्याच्या माध्यमातून एका रुग्णावर दुसऱ्यांदा मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण यशस्वी झाले. त्यातच सुखद बाब म्हणजे शहरामध्ये दुसऱ्यांदा तसेच तिसऱ्यांदा प्रत्यारोपणाच्या ५०पेक्षा जास्त केसेस आहेत आणि यातील अनेक केसेस यशस्वी ठरल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.
कोणत्याही व्यक्तीचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपण हेच दोन पर्याय शिल्लक राहतात. यातील डायलिसिस हा तात्कालिन उपचार ठरतो, तर प्रत्यारोपण हा दीर्घकालीन पर्याय ठरतो. प्रत्यारोपणानंतर संबंधित व्यक्तीचे जीवनमान हरतऱ्हेने उंचावते, असे वैद्यकतज्ज्ञ म्हणतात. प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती आपले स्वतःचे काम-व्यवसाय-नोकरीदेखील करू शकतात आणि आज अशा व्यक्ती सर्वत्र मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र वेगवेगळ्या कारणास्तव काहींचे प्रत्यारोपित केलेले मूत्रपिंड निकामी होऊ शकते आणि अशा व्यक्तीपुढे पुन्हा डायलिसिस किंवा दुसऱ्यांदा प्रत्यारोपणाचा पर्याय राहतो. अशा स्थितीनंतर एकाच व्यक्तीवर दुसऱ्यांदा प्रत्यारोपण झालेल्या शहरामध्ये सुमारे ५० केसेस आहेत, तर तिसऱ्यांदा प्रत्यारोपण झालेल्या किमान २ ते ३ केसेस आहेत. दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा प्रत्यारोपणाच्या सर्वाधिक ४७ पेक्षा जास्त केसेस यशस्वीपणे हाताळलेले शहरातील ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सुहास बावीकर हे ‘मटा’शी संवाद साधताना म्हणाले, मागच्या २८ वर्षांत मी शहरामध्ये किडनी प्रत्यारोपणाच्या ११०० पेक्षा जास्त केसेस केल्या आहेत. यामध्ये दुसऱ्यांदा प्रत्यारोपणाच्या ४५-४६ केसेस, तर तिसऱ्यांदा प्रत्यारोपणाच्या २ ते ३ केसेसचा समावेश आहे. दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदादेखील प्रत्यारोपण यशस्वी होऊ शकते आणि शहरामध्ये अशा केसेस नक्कीच वाढत आहेत.
तीन कारणांमुळे किडनीची वाट
एकूण तीन कारणांमुळे पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा प्रत्यारोपित केलेली किडनी निकामी होऊ शकते. यामध्ये पहिले कारण ठरते ते ‘रिजेक्शन’चे; म्हणजेच मूळ शरीर प्रकृती प्रत्यारोपित किडनी स्वीकारत नाही आणि शरीराच्या मूलभूत प्रतिकारशक्तीमुळे प्रत्यारोपित किडनी निकामी होऊ शकते. प्रत्यारोपित किडनी निकामी होऊ नये म्हणूनच ‘इम्युनोसप्रेशन’च्या गोळ्या संबंधित रुग्णाला दिल्या जातात व शरीराची प्रतिकारशक्ती शून्यावर आणून यथावकाश हळूहळू वाढवली जाते. मात्र ‘इम्युनोसप्रेशन’च्या गोळ्या बंद केल्या किंवा कमी केल्या किंवा अनियमित घेतल्या की पुन्हा प्रतिकारशक्ती वाढून प्रत्यारोपित किडनी निकामी होण्याचा धोका वाढत जातो. त्याचबरोबर, पुन्हा मूळ आजार उद्भवणे किंवा डोके वर काढणे, हे किडनी निकामी होण्याचे दुसरे कारण आहे, तर जंतुसंसर्ग हे किडनी निकामी होण्याचे तिसरे कारण आहे. अर्थात, तिन्ही कारणे तेवढीच महत्वाची आहेत, असेही डॉ. बावीकर म्हणाले.
दुसरे-तिसरे प्रत्यारोपण अवघड
दुसऱ्यांदा तसेच तिसऱ्यांदा केली जाणारी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया नक्कीच जास्त आव्हानात्मक असते आणि यामध्ये शल्यचिकित्सकाचे कसब पणाला लागते. दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा प्रत्यारोपणानंतर ‘इम्युनोसप्रेशन’च्या औधांचा डोस हा जास्त तीव्र स्वरुपात व अधिक प्रमाणात द्यावा लागू शकतो. अर्थात, जास्त तीव्र डोस दिल्यास प्रतिकारशक्ती अत्यल्प होऊन जंतुसंसर्गाची भीती वाढते व त्याचवेळी जंतूसंसर्ग होऊ नये म्हणूनही रुग्णाला जपावे लागते. एक प्रकारे ही तारेवरची कसरत असते. अर्थात, योग्य काळजी घेतली व औषधे-गोळ्या घेण्यात निष्काळजीपणा नाही केला, तर प्रत्यारोपण यशस्वी होऊ शकते, असे मूत्रमार्ग शल्यचिकित्सक डॉ. अभय महाजन यांनी ‘मटा’ला सांगितले. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्येही दुसरे-तिसरे प्रत्यारोपण शक्य असल्याचे मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सचिन सोनी म्हणाले.
हो, मी गोळ्या बंद केल्या होत्या
माझ्यावर २००९मध्ये पहिल्यांदा किडनी प्रत्यारोपण झाले होते व आईनेच किडनीदान दिले होते. मात्र दोन मुले, कुटुंबाचा खर्च जास्त, आर्थिक चणचण, यामुळे तब्बल चार महिने गोळ्या घेतल्या नाही व नेमकी त्यानंतर प्रत्यारोपण केलेली किडनी निकामी झाली व पुन्हा डायलिसिसवर यावे लागले. सुदैवाने, अवयवदानातून दुसऱ्यांदा किडनी मिळाली व पुन्हा एकदा मी आयुष्यात उभा राहात आहे, असे ३ मे रोजी शहरामध्ये दुसऱ्यांदा प्रत्यारोपण झालेला रुग्ण व हाडोळती (ता. अहमदपूर, जि. लातूर) ग्रामपंचायतचा सदस्य अनिल तोंडचिरकर यांनी ‘मटा’ला सांगितले.