म. टा. प्रतिनिधी, लातूर
जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याची माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सोमवारी लातूरात पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपाचे नेते शैलेश गोजमगुंडे, भारत चामे, प्रविण कस्तुरे यांची उपस्थिती होती.
राज्य सरकारला दोन वर्ष झाल्याच्या निमित्ताने मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी राज्य सरकारच्या विकास योजनाचा आढावा घेतला.
निलंगेकर म्हणाले, ‘राज्यात संवेदनशील सरकार काम करीत आहे. राज्य सरकारने दुष्काळ मुक्तीसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये जलयुक्त शिवार योजना आहे. या योजनेत पाचशे कोटी रुपयांचा लोकसहभाग आहे. गेल्या दोन वर्षांत राज्य सरकारच्या पुढाकाराने दोन कोटीपेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्याचा विक्रम करण्यात आला आहे. ज्याची नोंद गिनीज बुकात झाली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने निर्णय घेतले आहेत. दुष्काळामुळे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत कधीही एवढी मोठी रक्कम अनुदानरुपाने मिळाली नाही, ती या सरकारने वेळेत दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम आम्ही केले आहे.’
दुष्काळातील पाणी टंचाईच्या काळात लातूर सारख्या महनगराला रेल्वेने १११ फेऱ्या करून पाणीपुरवठा केला आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी जालना येथे सीड पार्क उभारणीसाठी १०९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. कृष्णा मराठवाडा प्रकल्प टप्पा एकसाठी चार हजार आठशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. निम्न दुधना प्रकल्पासाठी ८१९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रेशीम कोषाची खुली बाजारपेठ जालन्यात उभारली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
सोयाबीनची खरेदी हमीभावाने
सोयबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्या-त्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी किंवा बाजार समितीच्या आवारतच सोयाबीन केंद्र सुरू करण्याच्या सूचना ही देण्यात येतील असे, संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले.