म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नेहमी सामंजस्याच्या भूमिकेत असलेले महापौर नंदकुमार घोडेले सोमवारी सर्वसाधारण सभेत आक्रमक बनले. सर्वसाधारण सभा सुरू झाल्यावर उशिरा सभागृहात येणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी प्रवेश नाकारला. त्यामुळे मोजकेच अधिकारी सभागृहात होते. पथदिव्यांची कामे केली नाहीत म्हणून त्यांनी एका उपअभियंत्याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.
सर्वसाधारण सभेची निर्धारित वेळ सकाळी साडेअकराची होती, परंतु काही कारणांमुळे दुपारी एक वाजता सभा सुरू करण्यात आली, तसे निरोप अधिकारी व नगरसेवकांना देण्यात आले होते. एक वाजता सभा सुरू झाली, त्यावेळी सभागृहात शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी, उपायुक्त मंजुषा मुथा, मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज, उपायुक्त वसंत निकम, करमूल्य निर्धारक व संकलक महावीर पाटणी, घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता के. एम. फालक, उपअभियंता एस. एस. कुलकर्णी, अग्निशमन विभागाचे प्रमुख सुरे उपस्थित होते. सर्वसाधारण सभा सुरू होताच महापौरांनी सुरक्षारक्षकांना, 'उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांना सभागृहात येऊ देऊ नका,' असे आदेश दिले. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी अधिकाऱ्यांना सभागृहाच्या बाहेरच थांबवले.
नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत पथदिव्यांबद्दल तक्रारी केल्या. एलईडी दिवे लागतच नाहीत, काही भागात पथदिवे लावण्यात आले नाहीत. याबद्दल तक्रार केली तर त्याची दखल घेतली जात नाही, असा मुद्दा मीना गायके यांनी मांडला. अफसर खान यांनी देखील त्यांच्या वॉर्डातील पथदिव्यांची समस्या मांडली. दिवे बंद आहेत. तक्रार करून देखील ते सुरू केले जात नाहीत, असे ते म्हणाले. शिवसेनेचे नगरसेवक सीताराम सुरे यांनी भाक्तिनगरतील पथदिव्यांचा प्रश्न मांडला. यावर महापौरांनी विद्युत विभागाचे उपअभियंता के. डी. देशमुख यांना खुलासा करण्यास सांगितले, परंतु ते समाधानकारक खुलासा करू शकले नाहीत, त्यामुळे महापौरांनी देशमुख यांना पाच हजारांच्या दंडाची घोषणा केली. 'देशमुख यांच्यावर दंडात्मक कारवाई करा आणि त्याची नोंद त्यांच्या सेवापुस्तिकेत करा,' असे आदेश त्यांनी दिले. देशमुख यांच्यासह विद्युत विभागातील अन्य अधिकाऱ्यांवर देखील अशीच कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
\Bनिलंबनाचा इशारा\B
देशमुख यांनी या कारवाई बद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, 'मी रात्रंदिवस काम करतो. असे असताना मलाच दंड कसा काय करता? महापौरांना निर्णय आपल्याला मान्य नाही.' यावर महापौर देशमुख यांना म्हणाले, 'कारवाई तुमच्या एकट्यावर नाही. तुमच्या विभागावर आहे. आठ दिवसांत तुम्ही चांगल काम करून दाखवा. तुमचा दंड माफ करू. चांगले काम करता आले नाही तर निलंबनाची कारवाई देखील केली जाईल.'