म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद मध्य विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी सकाळी काही तासांत जाहीर होणार आहे. मतदारसंघात थेट मतांमध्ये होणारी फूट कोणाच्या पथ्थ्यावर पडणार हे काही तासांत समोर येणार आहे. लोकसभेच्या तुलनेत मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली असून ३१२ मतदान केंद्रापैकी ३९ केंद्रावर ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे.
शहरातील औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्येकाकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. सकाळी काही तासांत निकाल हाती येणार असला तरी मतदारसंघातील घसरता मतदानाचा टक्का चिंतेची बाब आहे. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात रंगत चौरंगी होईल असे सुरुवातीला चित्र होते. मात्र, हिंदू-मुस्लिम अशी उभी फूट पाडण्यात शिवसेना, एमआयएम दोन्ही पक्षांकडून प्रयत्न झाले आणि चित्र काहीसे बदलले. त्यामुळे मतांमध्ये विभाजनावर एकमेकांचया विजयाचे गणित जुळविले जात आहेत. बुथनिहाय मतदानाची माहिती समोर आल्यानंतर बुधवारी मतदारसंघात त्यावरच चर्चा रंगली. आकड्याचे गणित जुळविण्यात अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते गुंतलेले पहायला मिळाले. शिवसेनेकडून प्रदीप जैस्वाल, एमआयएमकडून नासेर सिद्दीकी, वंचित बहुजन आघाडीकडून अमित भुईगळ, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कदीर मौलाना, भाकपकडून अॅड. अभय टाकसाळ, असे एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत.
\B४०.८१ टक्के मतदार फिरकलेच नाहीत\B
मतदारसंघात लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत मतदानाचा टक्केवारी घसरली. विधानसभेला ५९.१९ टक्के मतदान झाले. एकूण एक लाख ९२ हजार ८०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बल ४०.८१ टक्के मतदारांनी मतदान केले नाही. जिल्ह्यामध्ये औरंगाबाद पूर्वनंतर सर्वात कमी मतदान झालेला हा मतदारसंघ आहे. लोकसभेला या मतदारसंघातून एक लाख ९८ हजार ७८५ मतदारांनी हक्क बजावला होता व ६२.१९ टक्के, असे प्रमाण होते.