अ‍ॅपशहर

हातात पेढ्याचा बॉक्स आणि गुलाबाचं फुल, डोळ्यात पाणी; पोलीस आयुक्तांना पाहून आजीबाई भावूक

६५ वर्षीय महिलेला कित्येक वर्ष फेऱ्या मारुनही न्याय मिळत नव्हता. मात्र औरंगाबाद शहर पोलिसांनी याची दखल घेऊन केलेल्या कारवाईनंतर या महिलेला न्याय मिळाला असून, महिलेने पोलीस आयुक्तांचे आभार मानले.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 4 Mar 2022, 10:50 pm
औरंगाबाद: शहरातील सिडको एन-3 भागातील महत्वाच्या ठिकाणी असलेल्या एका ६५ वर्षीय महिलेची कोट्यवधी रुपयांची जागा काही भूमाफियांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे बळकावली, तब्बल चार वर्ष शासकीय कार्यालयाचे खेट्या मारुनही न्याय मिळत नव्हता. मात्र औरंगाबाद शहर पोलिसांनी याची दखल घेऊन केलेल्या कारवाईनंतर या महिलेला न्याय मिळाला असून, महिलेने पोलिस आयुक्तांचे आभार मानले. तर यावेळी त्या चांगल्याच भावूक झाल्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Maharashtra Aurangabad grandmother thanked to Commissioner of Police for getting justice
आजीबाईंनी मानले पोलिस आयुक्तांचे आभार


मनाला चटका लावून जाणारी ही कहाणी औरंगाबाद शहरातील सिडको एन-3 मध्ये राहणाऱ्या ६५ वर्षीय कला चव्हाण यांची आहे. चव्हाण यांची मुलं अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यात सहा वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले. त्यामुळे त्या औरंगाबादमध्ये एकट्याच राहतात. याचाच फायदा घेत शहरातील काही भूमाफियांनी भाडेकरु असल्याच्या बहाण्याने त्यांच्या घराचा ताबा घेतला. त्यानंतर खोटी कागदपत्रे तयार करत त्यांची कोट्यवधींची जागा स्वत:च्या नावावर करत जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यामुळे बेघर झालेल्या कला चव्हाण यांनी आपल्याला न्याय मिळावा म्हणून अनेक शासकीय कार्यालयात खेट्या मारल्या, पण न्याय मिळत नव्हता. त्यामुळे हतबल झालेल्या चव्हाण यांनी औरंगाबाद शहर पोलीस दलाचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांची भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली. त्यांनतर पोलीस आयुक्तांनी वैयक्तिकरित्या लक्ष घालत तपासाचे आदेश दिले. अखेर पोलिसांनी या भूमाफियांना पोलीस खाक्या दाखवत कागदपत्रांची तपासणी केली असता, सर्व काही बनावट असल्याचे समोर आले. तर पोलिसांच्या कारवाईनंतर या भूमाफियांनी तात्काळ घर खाली करत ताबा चव्हाण यांना दिला.

आणि आजीबाई भावूक झाल्या....

चार वर्षांपासून शासकीय खेट्या मारुनही न्याय न मिळणाऱ्या कला चव्हाण यांना पोलीस आयुक्तांमुळे न्याय मिळाल्याने, त्यांनी आज पोलीस आयुक्त कार्यालय गाठले. पायऱ्या चढता येत नसल्याने त्यांनी पोलीस आयुक्तांची दुपारपर्यंत खाली थांबून वाट पहिली. आयुक्त खाली येताच त्यांनी हातातील पेढ्याचा एक बॉक्स आणि गुलाबाचा फुल देऊन आभार मानले. तर यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्या भावूक झाल्या, त्यांना या अवस्थेत पाहून बाजूला उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी सुद्धा स्तब्ध झाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज