अ‍ॅपशहर

पंतप्रधान मोदींच्या 'त्या' विधानावरुन काँग्रेस केंद्रीय मंत्र्याच्या घरावर 'धिक्कार मोर्चा' काढणार

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्र्यांच्या घरावर काँग्रेसकडून धिक्कार मोर्चे काढले जाणार आहेत. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या औरंगाबाद येथील निवासस्थानी सुद्धा औरंगाबाद काँग्रेसकडून मोर्चा काढला जाणार आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 11 Feb 2022, 11:37 pm
औरंगाबाद : देशातील वाढत्या कोरोनाला महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पंतप्रधान मोदी यांच्या याच विधानावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. जागोजागी आंदोलनं केली जात आहेत. उद्या ( शनिवारी ) महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांच्या घरावर काँग्रेसकडून धिक्कार मोर्चे काढले जाणार आहेत. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या औरंगाबाद येथील निवासस्थानी सुद्धा औरंगाबाद काँग्रेसकडून मोर्चा काढला जाणार आहे. याबाबत काँग्रेसचे औरंगाबाद प्रभारी मुजाहेद खान आणि जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nana patole and pm narendra modi
नाना पटोले आणि नरेंद्र मोदी


पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, "पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील जनतेच अवमान करणारे विधान लोकसभेत केले आहे. विशेष म्हणजे यावेळी महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री लोकसभेत हे सर्व ऐकत असताना आणि महाराष्ट्राचा अवमान होत असताना शांत बसले होते. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार उद्या राज्यातील सर्वच केंद्रीय मंत्र्यांच्या घरावर धिक्कार मोर्चा काढला जाणार आहेत."

मोर्चाचं स्वरूप कसं असेल?

मुजाहेद खान म्हणाले की, "उद्या शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून धिक्कार मोर्चा भागवत कराड यांच्या निवासस्थानी धडकणार आहे. शहर आणि ग्रामीण दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारीसह हजारो कार्यकर्ते या मोर्च्यात सहभागी होणार आहेत", अशी माहिती खान यांनी यावेळी दिली. तसेच "मोर्च्यासाठी पोलिसांकडे कायदेशीर परवानगी मागितली असून, जर पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही मोर्चा निघणारच", असेही खान म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं?

कोरोनाच्या पहिल्या लाटेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने मजुरांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. त्यामुळे अनंत हाल-अपेष्टा सहन करत या मजुरांना आपापल्या गावी परत जावे लागले. देशात करोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस कारणीभूत आहे. काँग्रेसने महाभयानक संकटातही गलिच्छ राजकारण केले, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केली. त्यांच्या याच वक्तव्यावरुन देशात रणकंदन सुरु आहे.

महत्वाचे लेख