अ‍ॅपशहर

छत्रपती संभाजीनगरातील राड्यानंतर परिस्थिती नियंत्रणात, पोलिसांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला

Chhatrapati Sambhajinagar Ruckus: छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात मध्यरात्रीच्या सुमारास तरुणांच्या दोन गटात किरकोळ वाद झाला. यानंतर जमाव आक्रमक झाल्याने तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Mar 2023, 10:46 am
छत्रपती संभाजीनगर : दोन गटात झालेल्या किरकोळ वादानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा झाला. यावेळी समाजकंटकांनी पोलिसांची ८ ते १० वाहने जाळली. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील किराडपुरा भागात घडली होती. मात्र पोलिसांनी अधिक कुमक मागवत परिस्थिती नियंत्रणात आणली असून आता परिसरात पूर्णपणे शांतता आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Chhatrapati Sambhajinagar Ruckus
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात उफाळलेला हिंसाचार निवळला


या प्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात तरुणांच्या दोन गटात किरकोळ वाद झाला. यानंतर जमावाने दगडफेक करण्यास सुरुवात केली. उपस्थित पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचे वारंवार आवाहन केले. मात्र जमाव अधिकच उग्र झाला होता. पोलिसांची अधिक कुमक येईपर्यंत जमावाने परिसरात उभ्या वाहनांची जाळपोळ सुरु केली होती. घटनेची माहिती मिळताच मध्यरात्री मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांततेचे आवाहन केले.

गहू साफ करण्याच्या मशीनमध्ये गळ्यातील रुमाल अडकला, फास बसून शेतकरी महिलेचा मृत्यू

शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न - अंबादास दानवे


रात्री झालेल्या परिस्थितीला पोलीस आयुक्त देखील जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मागील पंधरा दिवसापासून पोलिसांना शहरात एमआयएम आणि भाजप हे दोन्हीही आपलं राजकारण करण्यासाठी परिस्थिती खराब करू शकतात अशी माहिती दिली होती. इतकंच नाही तर मंत्रालयात देखील अशा पद्धतीची माहिती दिली होती, मात्र त्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळेच रात्री अशी परिस्थिती घडलेली आहे, या हल्ल्यात पोलीस देखील जखमी झालेले आहेत, पोलिसांची वाहनं जाळण्यात आलेली आहेत. त्यामुळे प्रकरण गंभीर असल्याने कोणाचीही हयगय करू नये आणि दोषींना तातडीने पकडावं अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.


गोंधळ घालणाऱ्यांना रात्री पर्यंत अटक करू - पालकमंत्री संदिपान भुमरे


किराडपुरा येथे गोंधळ घालणाऱ्या लोकांना रात्रीपर्यंत ताब्यात घेतलं जाईल. कुठलीही हयगय केली जाणार नाही, असं आश्वासन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिलं. मध्यरात्री दोन गटात वाद झाल्यानंतर काही वाहन राम मंदिर परिसरात जाळण्यात आली होती. त्यानंतर संदिपान भुमरे यांनी सकाळी परिस्थितीचा आढावा घेत पोलिसांना योग्य ते निर्देश दिले.

महत्वाचे लेख