अ‍ॅपशहर

संभाजीराजे महाविकास आघाडीसोबत जाणार?, ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं सूचक वक्तव्य

खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल ठाकरे सरकारमधील मंत्री अमित देशमुख यांनी सूचक वक्तव्य केलंय. त्यांच्या वक्तव्याने संभाजीराजे महाविकास आघाडीसोबत जाणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळाच चर्चिला जातोय.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 1 Mar 2022, 4:46 pm
औरंगाबाद: खासदार छत्रपती संभाजीराजे (yuvraj chhatrapati sambhajiraje) यांच्याबद्दल ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याने सूचक वक्तव्य केलंय. "महाविकास आघाडीच्या कामाबाबत संभाजीराजे यांनी विश्वास व्यक्त केला, ते आमच्यासोबत काम करणार असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं", असं विधान वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. औरंगाबाद येथील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sharad pawar, Uddhav thackeray And Sambhajiraje
शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे


यावेळी आपल्या भाषणात बोलताना अमित देशमुख म्हणाले की, "छत्रपती संभाजीराजे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आम्ही सर्वांनी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांच्या सर्व मागण्या साधारणत: मान्य केल्या. त्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं, यावेळी संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीच्या कारभाराला पसंती दिली तसंच सरकारबद्दल विश्वासही व्यक्त केला. त्यांनी पुढे एकत्र काम करण्याची ग्वाही दिली", असं अमित देशमुख म्हणाले.

अमित देशमुख यांचं स्पष्टीकरण

त्यांच्या या विधानावर पत्रकारांनी प्रश्न विचारताच अमित देशमुख म्हणाले की, "मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन संभाजीराजे यांनी छेडलं, ज्या मागण्या त्यांनी मांडल्या, त्यांच्या या मागण्या महाविकास आघाडी सरकारने मान्य करून मागण्यांना त्वरित मंजुरी दिली आणि चर्चेमध्ये ज्या मागण्या आहे त्याला अंतिम स्वरुप येईपर्यंत एकत्र काम करण्याची त्यांनी भावना व्यक्त केली त्याचा तो संदर्भ होता, असं अमित देशमुख म्हणाले.

तीन दिवसांत संभाजीराजेंच्या सर्व मागण्या मान्य, राजेंकडून सरकारचं कौतुक

ठाकरे सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर अखेर खासदार संभाजी छत्रपती यांनी काल उपोषण मागे घेतलं. तीन दिवसानंतर त्यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांनी संभाजीराजेंची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं लेखी हमीपत्र दिलं. त्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं. तसंच उपोषण सोडताना केलेल्या भाषणात सरकारने दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेत्यांचे आभार मानले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज