अ‍ॅपशहर

मराठवाड्यात अजूनही चर्चेचे गुऱ्हाळ; लातूर, नांदेड वगळता अजूनही चित्र अस्पष्टच

Lok Sabha Elections 2024: मराठवाड्यातील लातूर, नांदेड वगळता सहा मतदारसंघांतील चित्र अजूनही अस्पष्ट आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा खेचण्यासाठी आणखी काही दिवस रस्सीखेच सुरुच राहणार आहे

Authored byमकरंद कुलकर्णी | Edited byकिशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स 25 Mar 2024, 7:08 am
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन नऊ दिवस झाले तरी मराठवाड्यातील लातूर, नांदेड वगळता उर्वरित सहा मतदारसंघांतील चित्र अजूनही अस्पष्ट आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा खेचण्यासाठी संघर्ष सुरुच असून आणखी काही दिवस ही रस्सीखेच सुरुच राहणार आहे. दररोज नवनवीन नावांचे दावे समोर येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला रंग आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fadnvis thackrey pawar shinde
मराठवाड्याच चर्चेचे गुऱ्हाळ


लातूरमधून भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या विरोधात काँग्रेसने डॉ. शिवाजी काळगे यांना मैदानात उतरवले आहे. वंचित बहुजन आघाडी व अन्य पक्ष काय भूमिका घेणार हे लवकरच कळेल. नांदेड येथे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याविरोधात काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांना संधी दिली आहे. तूर्तास या दोन मतदारसंघांमध्येच दोन प्रमुख राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केली. भाजपने जालन्यातून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सहाव्यांदा उमेदवारी दिली. बीडमधून पंकजा मुंडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली आहे. या व्यतिरिक्त अद्याप एकाही उमेदवाराची घोषणा झालेली नाही.

मुळात कोणत्या मतदारसंघात कोण मैदानात असेल याच्याच वाटाघाटी अजून झाल्या नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधून (औरंगाबाद) शिवसेना आणि भाजप दोघांनीही उमेदवारीचा दावा केला आहे. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह चार नावांची चर्चा आहे. दुसरीकडे भाजपमधून केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्यासह तब्बल सहा नावांची चर्चा सुरु आहे. दोघांपैकी कुणाला मतदारसंघ सुटणार यासाठीही उमेदवार प्रतीक्षेत आहेत. त्यानुसार मोठे बदल होण्याचीही शक्यता आहे. महायुतीचे ठरत नसल्याचे पाहून महाविकास आघाडीनेही पॉज घेतला आहे. ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे असणार आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे की विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे याचीच सध्या चर्चा सुरू आहे. दररोज नावांची अदलाबदल झाल्याची चर्चा होते, ठोस निर्णय मात्र अद्यापही झालेला नाही. जालन्यातून महाविकास आघाडीतून काँग्रेस लढणार की उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडे जागा जाणार हे अजूनही निश्चित झालेले नाही. काँग्रेसकडून माजी आमदार डॉ. कल्याण काळे, ठाकरे गटाकडून डॉ. संजय लाखे पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. परभणीची परिस्थितीही वेगळी नाही.

शिवसेना आणि भाजपने आपापले दावे केले आहेत. विद्यमान खासदार संजय जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुन्हा रिंगणात असतील. त्यांचा मुकाबला करण्यासाठी परभणीतून कोणाला संधी मिळणार हे अजूनही अस्पष्ट आहे. भाजपने ही जागा मिळावी, यासाठी जोर लावला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा आहे. हिंगोलीची परिस्थितीही अशीच आहे. विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना शिवसेना मैदानात उतरवणार असल्याचे मानले जाते. भाजपने या जागेवरही दावा केला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतून काँग्रेसकडून उमेदवारीसाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. दोन्हीकडच्या चर्चांचे गुऱ्हाळ अजूनही सुरु आहे. राजकीयदृष्ट्या राज्यात नेहमीच चर्चेत असलेल्या बीडमधून भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवार दिला जाणार आहे. बजरंग सोनवणे आणि ज्योती मेटे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. याशिवाय अन्य दोन, तीन जणांच्या नावाचाही पक्षाने विचार केला आहे. यावर निर्णय होणे बाकी आहे.

धाराशीव (उस्मानाबाद) मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. महायुतीतून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांनी उमेदवारीसाठी जोर धरला आहे. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत, माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार राणा जगजितसिंह पाटील, प्रविणसिंह परदेशी, आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री बसवराज पाटील, सुरेश बिराजदार या महायुतीतील नेत्यांसह आणखी आठ दहा जणांची नावे चर्चेत आहेत. तीनही पक्षांकडून आपापल्या उमेदवारीचे दावे केले जातात. रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत मराठवाड्यातील जागांबाबत महायुतीत अजूनही एकमत झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे चर्चेचे हे गुऱ्हाळ आणखी किती दिवस सुरू होणार याबाबत अनिश्चितता आहे.
लेखकाबद्दल
मकरंद कुलकर्णी
मकरंद कुलकर्णी हे महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर आवृत्तीत गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत आहे. पत्रकारितेत २४ वर्षांचा अनुभव, राजकारण, ग्रामीण विकास, जिल्हा परिषद, आरोग्य, उद्योग, अर्थ, गुंतवणूक, पंचाय राज व्यवस्था आदी विषयांवर लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख