म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लग्नात मित्रांना पाजलेल्या दारुचे ७० हजारांचे बिल सासरच्या मंडळीनी दिले नसल्याने; तसेच अन्य कारणांसाठी ३३ वर्षांच्या विवाहितेचा छळ करण्यात आला. मे २०१५ ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत सावेडी (अहमदनगर) येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी सासरच्या दहा जणांविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकुंदवाडी, विठ्ठलनगर भागात या महिलेचे माहेर आहे. महिलेचा विवाह २७ मे २०११ रोजी या हरजीतसिंग सोडी याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर तिसऱ्या दिवसापासूनच सासरच्या मंडळींनी विवाहितेला, 'लग्नामध्ये मित्रांना ७० हजार रुपयांची दारू पाजली. ते बिल तुझ्या वडीलांनी दिले नाही,' म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली; तसेच ट्रॅव्हल्सच्या व्यवसायासाठी वडिलांकडून २५ लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. या विवाहितेला विविध कारणांसाठी शारिरीक व मानसिक त्रास देण्यात आला.
ही विवाहिता गर्भवती असताना गर्भलिंग चाचणी करून घे, मुलगी असेल तर आपल्याला नको, असे सांगण्यात आले. विवाहितेने चाचणी करण्यास नकार दिला असता तिच्या उपचारामध्ये आरोपींनी अडथळे आणले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत. या विवाहितेच्या तक्रारीवरून आरोपी हरजीतसिंग सोडी, जगजीतसिंग सुरेंद्रसिंग सोडी, सुरेंद्रसिंग गुरूबक्ष सोडी, विजय ओमप्रकाश आनंद, वेधप्रकाश सिंगानी, सागर केवलप्रसाद मेहरा व चार महिला आरोपी (सर्व रा. अहमदनगर) यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार काटकर याप्रकरणी तपास करीत आहेत.