अ‍ॅपशहर

एल. आर. बाली यांना मिलिंद समता पुरस्कार

जालंधर येथील ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत एल. आर. बाली यांना यंदाचा मिलिंद समता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी पुरस्काराची गुरुवारी घोषणा केली.

Maharashtra Times 13 Jan 2017, 12:08 pm
औरंगाबाद : जालंधर येथील ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत एल. आर. बाली यांना यंदाचा मिलिंद समता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी पुरस्काराची गुरुवारी घोषणा केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम milind samata puraskar
एल. आर. बाली यांना मिलिंद समता पुरस्कार

पंजाब प्रांतातील एल. आर. बाली यांना अगदी तरुण वयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभला. आंबेडकरी विचारांनी ते खूप प्रभावित झाले. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी केंद्र सरकारच्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी आंबेडकरी चळवळीत झोकून दिले. १९६४मध्ये झालेल्या भूमिहीन सत्याग्रहात त्यांना आणि त्यांची पत्नी व दोन मुलांना तुरुंगवास सोसावा लागला. प्रारंभीच्या रिपाइंचे अनेक वर्षे ते जनरल सेक्रेटरी होते. बाली यांनी पंजाबी व हिंदी भाषेत लिहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र लोकप्रिय ठरले. त्यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांनी देशभरात खळबळ निर्माण केली. बाली यांनी काश्मीर ते कन्याकुमारी असे शेकडो दौरे केले. १९५८पासून इंग्रजी व हिंदी भाषेत प्रकाशित होणाऱ्या ‘भीमपत्रिका’ या नियतकालिकाचे ते संपादक आहेत. ८६ वर्षांचे बाली अजूनही संघर्षशील आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा ही पुरस्कारामागील भूमिका आहे, असे प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी सांगितले. यापूर्वी मिलिंद समता पुरस्कार बाबुराव बागुल, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. सुखदेव थोरात, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. रुपा कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमाचा सोहळा लवकरच घेण्यात येणार असल्याचे डॉ. प्रधान यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज