म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'विसाव्या शतकाच्या प्रारंभीची मराठी पत्रकारिता सामाजिक विषमतेच्या झाडाच्या फांद्या झोडत होती. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेच्या मुळ्या उखडून फेकल्या. सध्याच्या भयावह परिस्थितीचे इशारे आंबेडकरांनी मागील शतकात पत्रकारितेतून दिले होते. राजकीय व सामाजिक पुनर्रचनेचा विचार मांडणारी बाबासाहेबांची पत्रकारिता होती', असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. ऋषीकेश कांबळे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या वतीने 'मूकनायक' नियतकालिकाच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष व्याख्यान घेण्यात आले. महात्मा फुले सभागृहात गुरुवारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे व साहित्यिक डॉ. ऋषीकेश कांबळे यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता व सद्यकालीन परिस्थिती' या विषयावर विचार मांडले. यावेळी प्रभारी प्रकुलगुरु डॉ. प्रवीण वक्ते व केंद्र संचालक डॉ. सतीश दांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. 'मूकनायक' नियतकालिकाच्या विचार शैलीवर कांबळे यांनी भाष्य केले. 'मूकनायक'चा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी प्रकाशित झाला. या अंकाला राजर्षी शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती. समाजाच्या समस्यांचे निराकरण करणारे साधन म्हणून 'मूकनायक' सुरू झाले. 'मनोगत' अग्रलेख वाचल्यानंतर बाबासाहेबांचा सामाजिक दृष्टिकोन स्पष्ट होतो. बाबासाहेबांनी लेखनात संताप व्यक्त केला तरी भाषेचा तोल ढळू दिला नाही. ही गोष्ट अनेक संपादकांना जमली नाही. काळाच्या मर्यादा भेदून विचार मांडणारी दृष्टी बाबासाहेबांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य होते. राज्यघटनेत तरतूद असूनही मोफत शिक्षण प्रत्यक्षात येऊ शकले नाही. १९२० चे आणि २०२० चे सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय पर्यावरण पाहिल्यास परिस्थिती बदलली नसल्याचे दिसते. त्यामुळे बाबासाहेबांच्या पत्रकारितेतील विचार लक्षात घेऊन वाटचाल क्रमप्राप्त ठरते', असे कांबळे म्हणाले.
विजय चोरमारे यांनी 'मूकनायक'चे वेगळेपण सांगत सद्यकालीन पत्रकारितेवर भाष्य केले. 'एक जात म्हणजे एक मजला असून या मजल्याला शिडी नाही. गुणवान असूनही खालच्या मजल्यावरील व्यक्तीला वरच्या मजल्यावर प्रवेश नाही आणि अपात्र असूनही वरच्या मजल्यावरील व्यक्तीला खालच्या मजल्यात ढकलण्याची कुणाची हिंमत नाही, असे सामाजिक आकलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्या अग्रलेखात मांडले होते. तेव्हा ब्राह्मणेतर वृत्तपत्रं असली तरी त्यात दलितांच्या प्रश्नांना फारसे स्थान नव्हते. ही खंत असल्याने बाबासाहेबांनी 'मूकनायक' सुरू केले. आजच्या पत्रकारितेतही दलित-वंचितांना फारसे स्थान नसल्याची अपराधी भावना आहे. पीडितांच्या चेहऱ्यावरील एक रेषाही बदलण्याचा प्रयत्न तळातही दिसत नाही', असे चोरमारे म्हणाले. यावेळी त्यांनी 'आर्टिकल १५' ही कविता सादर केली.
प्रास्ताविक डॉ. सतीश दांडगे यांनी केले. डॉ. कैलास अंभुरे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. ह. नि. सोनकांबळे यांनी आभार मानले.
\Bगरीबांचे प्रश्न बेदखल\B
गोवंश हत्याबंदी झाल्यानंतर शेती आणि गरीब घटकांवर त्याचे गंभीर दुष्परिणाम झाले. मात्र, उच्चवर्गीय पत्रकारितेने समस्येची दखल घेतली नाही. मध्यवर्ती प्रसारमाध्यमांनी मागील पाच वर्षांत महत्त्वाचे प्रश्न बेदखल केले. शंभर वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी रूढ केलेल्या पत्रकारितेची गरज आहे. चळवळीतील वृत्तपत्रे बंद पडत असताना वैचारिक प्रयत्नांना समाजाची साथ आवश्यक आहे. बाबासाहेबांनी दाखवलेल्या सकारात्मक मार्गाने पुढे जावे लागेल, असे ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणाले.