अ‍ॅपशहर

भाजपने व्यापाऱ्यांचे ३० लाख रुपये थकवले

Maharashtra Times 17 Dec 2017, 3:27 am
नांदेड - पारदर्शक कारभाराचा दावा करीत असलेल्या भाजपने नांदेडमधील व्यापाऱ्यांचे २५ ते ३० लाख रुपये थकवल्याने वेगवेगळ्या व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. महापालिका निवडणुकीत दिलेले काही व्यापाऱ्यांचे धनादेश बँक खात्यात शिल्लक नसल्याने वटत नसल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nanaded bjp
भाजपने व्यापाऱ्यांचे ३० लाख रुपये थकवले

ऑक्टोबर महिन्यात नांदेड-वाघाळा मनपाची निवडणूक पार पडली. भाजपनेही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची कोली होती. बहुमत मिळवण्यासाठी हायटेक प्रचारयंत्रणा राबवली. प्रचारासाठी खास मुंबईची टीम बोलावण्यात आली होती. मुख्यमंत्र्याचे काही विश्वासू मंडळी नांदेडात तळ ठोकून होती. निवडणुकीपूर्वी मुंबईच्या टीमने सर्वच प्रभागात फिरून तेथील नागरिकांशी संवाद साधत समस्या जाऊन घेतल्या. त्यानंतर शहरातील एका भव्य-दिव्य मंगल कार्यालयात मुख्य प्रचार कार्यालय थाटण्यात आले. पक्षाच्या वतीने शहराच्या सर्वच भागात भव्य होर्डिंग्ज लावण्यात आले होते. पोस्टर, बॅनर, पोलचिट, नाश्ता, जेवण यासाठी वेगवेगळ्या स्थानिक व्यापाऱ्यांना बोलावून ऑर्डर देण्यात आल्या. या ऑर्डर देताना अ‍ॅडव्हान्स म्हणून काही रक्कम रोखीने देण्यात आली तर उर्वरित रकमेचे धनादेश देण्यात आले होते.
रोखीने रक्कम दिल्यानंतर महानगराध्यक्षांच्या स्वाक्षरीने हे धनादेश मिळाल्यानंतर व्यापाऱ्यांनी मोठ्या आनंदाने काम केले. निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष किंवा जिल्ह्याचे प्रभारी कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी हिशोबाबाबत कोणतीही विचारणा केली नाही किंवा उधारी देण्यासंदर्भात कोणतेही नियोजन करण्याचे सौजन्य दाखवले नाही. पक्षाचे महानगराध्यक्ष नांदेडमधील मोठे शिक्षणसम्राट असल्याने व्यापाऱ्यांना पैसे मिळतील अशी आशा आहे; पण कधी मिळतील याबाबत ते साशंक आहेत. पोलचिट, बॅनर, मंगल कार्यालय, जेवण व अन्य छोट्या-मोठ्या खर्चाचे तब्बल २५ ते ३० लाख रुपये थकल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उधारीसाठी व्यापाऱ्यांनी तगादा लावल्याने महानगराध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व निवडणुकीतील मुख्य संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याकडे धाव घेतली; पण त्यांनी टोलवाटोलवी केल्याचे सांगण्यात आले. मनपा निवडणुकीला दोन महिने उलटले तरी अद्याप उधारी न मिळाल्याने व्यापारी अस्वस्थ आहेत; तर दुसरीकडे नेत्यांनी हात झटकल्याने महानगराध्यक्ष हतबल झाले आहेत.


‘दिलेला शब्द तरी पाळावा’
प्रचारादरम्यान भाजप नेत्यांनी नांदेडकरांना वेगवेगळी आश्वासने दिली होती. भाजपच्या पारड्यात केवळ सहा जागा पडल्या होत्या. हायटेक प्रचार करून पक्षाने भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला तो सपशेल अपयशी ठरल्यानंतर आता आम्हाला दिलेला शब्द तरी पाळावा अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज