चैत्र प्रतिपदा अर्थात मराठी नववर्ष गुढीपाडवा या दिनाचे औचित्य साधून नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्यावतीने गुढीपाडवा पहाट-भुपाळी ते भैरवी हा गीत-संगीत नृत्यांचा अनोखा आविष्कार सादर करएयात आला. घनःश्याम सुंदरा ते तम निशेचा सरला....या एकापेक्षा एक सरस गितांनी तसेच विविध नृत्य कलाकृतीने या कार्यक्रमात रंगत आणली.
भुपाळी ते भैरवी या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर शैलजा स्वामी यांच्या हस्ते झाले. यावेळी मनपाचे विरोधी पक्षनेते बंडू खेडकर, माजी सभापती किशोर स्वामी, सहायक आयुक्त चौरे यांची उपस्थिती होती. विजय जोशी आणि वर्धिनी जोशी यांच्या घनःश्याम सुंदरा या गिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्त्रीच्या जन्मावर आधारीत १४ गाण्यांचा गितकुंज वर्धिनी जोशी हिने सादर केला. याला रसिकांनी उत्स्फूर्त दिला. रागिनी जोशीच्या बोलावा विठ्ठल व मायभवानी या गीतांना रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
श्रीरंग चिंतेवार यांनी गायिलेल्या ‘नाम तुझे घेता देवा, तेच स्वप्न लोचनात, लाजून हासणे…’ या गितांना रसिकांची भरभरुन दाद मिळाली. प्रसाद जोशी यांनी ‘शोधीशी मानवा’ हे गीत गावून कार्यक्रमात रंगत आणली. विजय जोशींनी गायिलेल्या ‘दशरथा घे हे पायसदान, इंद्रायणी काठी’ या गितांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.
भरत जेठवानी आणि संचाने सुर निरागस हो, जय मल्हार, कोळीगीत आदी नृत्य सादर करुन रसिकांच्या अपेक्षेचे पारणे फेडले. उत्कृष्ट लयबद्धता व नृत्यांची जबरदस्त मांडणी यामुळे हा कार्यक्रम चांगलाच रंगला. विजय बंडेवार यांनी निवेदनाला दिलेली साथ उत्कृष्ट होती.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रख्यात गायक धनंजय जोशी, रत्नाकर अपस्तंभ, वर्धिनी जोशी यांनी नाट्यगिते व गझल सादर करुन कार्यक्रमात आणखीनच रंगत आणली. ‘जय शंकरा, दिल की तपिश, घेई छंद मकरंद, हे सुरांनो चंद्र व्हा’ या एकापेक्षा एक सरल नाट्यगितांनी जोशी आणि अपस्तंभ यांनी रसिकांचे पारण फेडले. वर्धिनी जोशी ऋतूराज आज वनी आला हे नाट्यगित तर गाण्यात सर्व माझ्या...माझे इमान आहे, ही गझल सादर केली.
तम निशेचा सरला या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम सकाळी असला तरी सभागृह खचाखच भरले होते. कार्यक्रमाचे संगीत साथ शेख नईम, स्वरुप देशपांडे, स्वरेश देशपांडे, रतन चित्ते, सिध्दोधन कदम, पंकज शिरभाते, जगदीश देशमुख, भार्गव देशमुख यांनी केली. निर्माता विजय जोशी व सहाय्य गोविंद पुराणिक यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला.