म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळाचे कामकाज सुरू करावे यासह इतर मागण्यांसाठी वृत्तपत्र विक्रेता संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा भाग असलेल्या या आंदोलनात शहर परिसरातील सुमारे दोनशे वर्तमानपत्र विक्रेत्यांनी सहभाग घेतल्याचे संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जगताप यांनी सांगितले. वृत्तपत्र विक्रेत्यांना असंघटित कामगार म्हणून राज्यात तत्काळ नोंदणी सुरू करा, सुरक्षा मंडळाच्या कामाकाजासाठी आवश्यक त्या प्रशासकीय सेवा-सुविधा तत्काळ देण्यात येऊन मंडळ प्रत्यक्षात कार्यरत करावे, असंघटित कामगार वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी तातडीने भरीव आर्थिक तरतूद करावी, महाराष्ट्र राज्य असंघटित सुरक्षा मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ गठीत करावे, गटई कामगाराप्रमाणे मोक्याच्या ठिकाणी स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच सध्या अस्तित्वात असलेले स्टॉल अतिक्रमणात धरू नये, शासकीय घरकुल योजनेमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव कोटा ठेवावा, आदी मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामध्ये अध्यक्ष अण्णासाहेब जगताप यांच्यासह नीलेश फाटके, आसाराम कुलकर्णी, माणिक कदम, भीमराव वायभट, राजू जगताप, प्रभाकर बनसोडे, गोपिनाथ माळी, विष्णू ढाकणे, नितीन दहाड, रामकृष्ण राऊत यांच्यासह इतरांनी सहभाग घेतला. या आंदोलनाला औरंगाबाद जिल्हा पत्रकार संघाने आपला पाठिंबा दिला आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय प्रतिनिधी, औरंगाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, सरचिटणीस संजय वरकड, मुंबई प्रतिनिधी सुनीलचंद्र वाघमारे यांनी केली आहे.