म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कृषी विभागात कंत्राटी कृषी सर्वेक्षक भरतीत गैरव्यवहार झाला आहे. जिल्ह्यात सहा उमेदवारांचा प्रवर्ग बदलून अनुभव कालावधी कमी करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांना डावलून त्यांच्या जागेवर इतर उमेदवारांना संधी देण्यासाठी आर्थिक देवघेव झाल्याची शक्यता आहे,’ असे भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्हा कृषी कार्यालयात ३५ कीड सर्वेक्षकांची चार वर्षांपूर्वी नियुक्ती करण्यात आली. या भरतीचे काम ‘थर्ड आय सिक्युरिटी सर्व्हिसेस’ ही चंद्रपूर येथील संस्था करीत आहे. संतोष उमके व विनोद उमके या दोघांची चार वर्षांपूर्वी कीड सर्वेक्षकपदी नियुक्ती झाली होती. यंदा नवीन सर्वेक्षक भरती करण्यात आली. अनुभवी कर्मचाऱ्यांना संधी देण्याबाबत ‘जीआर’मध्ये उल्लेख आहे. उमके ‘एससी’ प्रवर्गातील असताना त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवण्यात आले. तसेच चार वर्षांचा अनुभव दोन वर्षे दाखवला. दुसरे कर्मचारी रवींद्र केदारे यांचा दोन वर्षांचा अनुभव शून्य दाखवून त्यांना नोकरीतून कमी करण्यात आले. या दोघांनी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन झव्हेरी यांना माहिती दिली. संबंधित कंत्राटदार आणि कृषी अधिकाऱ्यांशी झव्हेरी यांनी संपर्क साधला. दोघांनी जबाबदारी परस्परांकडे ढकलली. कृषी विभागातील अधिकारी अंतिम यादी तयार करतात. अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून नावे बदलली असून त्यांना विचारणा करा, असे कंत्राटदाराने सांगितले.
फुंडकरांना भेटणार
‘प्रत्येक जिल्ह्यात कीड सर्वेक्षक भरतीत आर्थिक देवघेव झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांची मंगळवारी भेट घेऊन चौकशी करण्याची मागणी करणार आहे. संबंधितांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करीन,’ असे किशनचंद तनवाणी यांनी सांगितले.