\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
\Bमहापालिकेने शहरातील सुमारे ११४४ दिव्यांगांना आतापर्यंत एक कोटी १७ लाख १३ हजार रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. हे अनुदान दिव्यांगांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेने आपल्या बजेटच्या पाच टक्के रक्कम दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च केली पाहिजे असा शासनाचा नियम आहे. त्यानुसार महापालिकेने दिव्यांगांना अनुदानाचे वाटप केले आहे.
शासनाच्या नियमानुसार दिव्यांगांना अनुदानाचे वाटप व्हावे म्हणून आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार संघटनेने महापालिकेत वारंवार आंदोलन केले. त्यामुळे बजेटच्या पाच टक्के खर्च दिव्यांगांसाठी करण्यास पालिकेचे प्रशासन आणि पदाधिकारी तयार झाले. ४० ते ८० टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तीला दर महिन्याला दोन हजार रुपये तर दिव्यांगाचे प्रमाण ८० टक्के पेक्षा जास्त असलेल्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेने दिव्यांगांची नोंदणी करून घेतली. १३०० जणांची नोंदणी पालिकेकडे झाली आहे. त्यापैकी ११४४ दिव्यांगांना पालिकेतर्फे अनुदान वाटप करण्यात आले आहे.