म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एक महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असलेल्या कुटुंबाची उपासमार सुरू आहे. या गरजू कुटुंबांना गेब्स फाउंडेशनने मदतीचा हात दिला. दीडशे गरजू कुटुंबांना एक महिन्याचे जीवनावश्यक साहित्य देण्यात आले.
करोनामुळे लॉकडाऊन झाल्याने गरीब कुटूंबावर उपासमारीची वेळ आली. जगण्याचा प्रश्न गंभीर असताना गरजू कुटूंबाना गेब्स फाऊंडेशनचे अध्यक्ष विजयसिंग ठाकोर आणि सल्लागार सदस्य अंजू गोडबोले यांनी कुटूंबासाठी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. गेब्स फाउंडेशन गरजू व्यक्तींना फूड रिलीफ किटचे वाटप करीत आहे. या किटचे वजन चोवीस किलो असून आतापर्यंत दीडशे कुटूंबाना किट वाटप करण्यात आले.एका फूड रिलीफ किटमध्ये दहा किलो गव्हाचे पीठ, पाच किलो तांदूळ, दोन किलो साखर, दोन किलो गोडतेल, एक किलो तूर डाळ, मीठ, शेंगदाणे, बिस्कीट, टूथपेस्ट आणि साबण या वस्तूचा समावेश आहे. मुकुंदवाडी, संजयनगर, शहाशोकत कॉलनी, हनुमाननगर, बायजीपुरा, मिलिंदनगर, छावणी, लक्ष्मी कॉलनी, वाळूज एमआयडीसी परिसरातील गरजवंत कुटुंबाना किट वाटप करण्यात आले. गरजू कुटुंबांना आणखी किट वाटप करण्यात येणार असून या उपक्रमासाठी गणेश मते, घनश्याम मते, भीमराव बनसोड, सुनील गायके परिश्रम घेत आहेत.