म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
विमा कंपनीने गारज (ता. वैजापूर) कृषी मंडळातील शेतकऱ्यांना केवळ एक टक्का विमा मंजूर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी उपविभागिय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांची भेट घेऊन विमा कंपनीची चौकशी करण्याची मागणी केली. तीन मेपर्यंत कारवाई न झाल्यास सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
वैजापूर तालुक्यातील गारज मंडळातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पाच टक्के विमा रक्कम भरली होती, परंतु इफको टोकियो या विमा कंपनीने या शेतकऱ्यांना केवळ सहा टक्के विमा मंजूर केल्याने त्यांना एक टक्क्याचा लाभ मिळणार आहे. वास्तविक शासनाने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला असून, गारज मंडळाची आणेवारी ४५ टक्के आहे. त्यामुळे शंभर टक्के विमा भरपाई मिळणे अपेक्षित होते मात्र, विमा कंपनीने केवळ एक टक्का मंजुरी दिल्याने शेतकरी संतापले आहेत. संतोष सरोवर, योगेश सूर्यवंशी, योगेश चव्हाण, दादासाहेब यादव, राहुल सरोवर, गणेश कांदे या शेतकऱ्यांनी निवेदन दिले.