म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बाळाच्या जन्मानंतर सहा महिने बाळाला केवळ स्तनपान (एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग) करणाऱ्या ग्रामीण मातांचे प्रमाण हे फक्त ३८ टक्के आहे आणि त्यामागे मातांना करावे लागणारे भरपूर कष्ट, पौष्टिक आहाराचा अभाव, अंधश्रद्धा आदी कारणे असल्याचे घाटीत आलेल्या दीड हजार मातांच्या सर्वेक्षणावरुन स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे हा अभ्यास व संशोधन दिवी सिंग या घाटीची विद्यार्थिनीने केला असून, तिच्या संशोधन निबंधाची भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) केली आहे. तसेच इतर तीन विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधांचीही 'आयसीएमआर'ने निवड केली असून, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
पदवीपूर्व विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी उत्तेजन मिळावे, या हेतुने दरवर्षी 'आयसीएमआर'कडून अखिल भारतीय पातळीवर शोधनिबंध स्पर्धा घेतली जाते. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (घाटी) दिवी सिंग (नवजात अर्भक वैद्यकशास्त्र विभाग), सोहम बरकुले (जनवैद्यक औषधशास्त्र), दिव्यांशी बजाज (नवजात अर्भक वैद्यकशास्त्र विभाग) व विधी मालु (शरीरशास्त्र) या चार विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधांची निवड करण्यात आली आहे. दिवी सिंग या विद्यार्थीनीने स्तनपानविषयी संशोधन केले व केवळ ३८ टक्के महिलाच स्तनपान करत असल्याचे समोर आणले. नवजात शिशुशास्त्र विभागाचे प्रमुख एल. एस. देशमुख यांनी दिवी सिंग हिला मार्गदर्शन केले. सोहम बरकुले या विद्यार्थ्याने 'शेतकऱ्यांच्या ताणतणावाचे कारण व ताण वाढविणारे घटक' यावर अभ्यास केला आणि वाढते कुटुंब व घटते उत्पन्न हेच ताणामागचे मुख्य कारण असल्याचे नमूद केले. जनऔषध वैद्यकशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. मोहन डोईबळे, डॉ. स्मिता अणदुरकर यांचे सोहम याला मार्गदर्शन लाभले. नियमित औषधी, व्यायाम व आहारामुळेच दुसऱ्या प्रकारचा मधुमेह नियंत्रणात राहतो, असे संशोधन विधी मालू हिने आपल्या निबंधात मांडले. तिला शेख साजिया मसूर यांचे मार्गदर्शन लाभले. दिव्यांशी बजाज हिने 'मातांमध्ये कमी वजनाच्या बाळाची काळजी घरी कशी घ्यावी' यावर संशोधन केले. त्यांना सहयोगी प्राध्यापक डॉ. अमोल जोशी यांनी मार्गदर्शन केले.