अ‍ॅपशहर

शिवसेना मराठा आरक्षणाच्या विरोधात

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तत्कालीन सरकारने नेमलेला समितीचा मी अध्यक्ष होतो. राज्यातील १७ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण केले. ठिकठिकाणी मला अनेक पक्ष, संघटना, जाती, धर्माच्या संघटनांची शिष्टमंडळे भेटली आणि मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली.

Maharashtra Times 12 Feb 2018, 8:12 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rane


मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तत्कालीन सरकारने नेमलेल्या समितीचा मी अध्यक्ष होतो. राज्यातील १७ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण केले. ठिकठिकाणी मला अनेक पक्ष, संघटना, जाती, धर्माच्या संघटनांची शिष्टमंडळे भेटली आणि मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडली. शिवसेनेचे एकही शिष्टमंडळ मला भेटले नाही. आरक्षणाचा बाजूने शिवसेनेची भूमिका नव्हती. मराठा क्रांती मोर्चांची भव्यता पाहिल्यानंतर शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे यांनी 'आम्ही आरक्षणाचा बाजूने आहोत,' असे जाहीर केले, असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला.

सिडको एन - सात येथील रामलिला मैदानावर राणे यांची रविवारी रात्री सभा झाली. पक्षस्थापनेनंतरची ही पहिलीच सभा होती. माजी महापौर सुदाम सोनवणे, जगदीश बाबर, निलेश भोसले, मनोज कदम, सम्राट महाडिक, संजय पाटील, संदीप कुरतडकर, संतोष पाटील, राजेश आठले, सिद्धार्थ वानखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राणे यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर कडाडून हल्ला चढविला. भाजपच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. राणे म्हणाले,'तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी एक समिती नेमली. त्याचा अध्यक्ष मी होतो. नियमात बसवून आरक्षण कसे देता येईल यासाठी देशभरातील तज्ज्ञांना भेटलो. शिवसेनेचे एकही शिष्टमंडळ भेटले नाही. शिवसेनेने मराठा समाजाचा द्वेष केला. त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये मराठा उमेदवार डावलले.'

तुम्ही ३४ टक्के आहात. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एकजूट दाखवा, आरक्षण मिळेल, असा सल्ला त्यांनी दिला. राणे म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांना शेतीतले काही कळत नाही. केवळ भावनेचे राजकारण केले. शिवसेनेने मराठवाड्यातील तरुणांना काय दिले? तुमचे खासदार चार टर्म निवडून कसे काय येतात, हे आश्चर्य आहे. अभ्यास आणि खैरे असे समीकरणच कुठे जुळत नाही. ते आमदार, मंत्री असताना कधीच अभ्यासपूर्ण वक्तव्य करत नव्हते. औरंगाबाद महापालिकेची काय अवस्था आहे. १२ कोटींचे वीजबिल थकित आहे. शहरात पाणी नाही, रस्ते खराब आहेत, २५ वर्षांपासून शिवसेना सत्तेत असून हे हाल आहेत. खैरे उठसूट ठाकरे कुटुंबीयांच्या पाया पडतात. त्यामुळेच कदाचित त्यांचे नेता म्हणून प्रमोशन केले.'

राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपचाही समाचार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाचा समाचार घेताना राणे म्हणाले, की १५ वर्षे सत्तेत राहून यांनी काही केले नाही आणि आता मोर्चे काढत आहेत. अजित पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातील धरणांची उंची वाढवली, पण मराठवाड्यात पाणी मिळावे म्हणून काहीच केले नाही. पदावर असताना मराठवाडा का आठवला नाही? काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनाही मराठवाड्याशी काही घेणेदेणे नाही. १३ वर्षे मुख्यमंत्रिपद मराठवाड्याकडे होते, त्यांनी काय दिवे लावले? भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली आश्वासने आठवली पाहिजेत. शेतीमालाला हमीभाव, नोकऱ्या कुठे आहेत? कर्जमाफीवर लोक नाराज आहेत. सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे. भाजपने या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. मी एनडीएला पाठिंबा दिला, पण त्यांचा बांधील नाही.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज