\Bम. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद\B
शहरात २०१८मध्ये दंगल उसळली. त्यात झालेल्या गोळीबारात फुफ्फुसात गोळी अडकून एक २० वर्षीय युवक जखमी झाला होता. त्याला होत असलेल्या वेदना व त्रासाबद्दल समिती गठीत करून तपासणी करा, असा आदेश न्या. टी.व्ही. नलावडे आणि न्या. एम.जी. शेवलीकर यांनी घाटीच्या आधिष्ठतांना दिले.
याप्रकरणात जिन्सी परिसरात जखमीच्या नातेवाईकाने याचिका केली आहे. दंगल उसळलेली असताना ११ मे २०१८ रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास याचिकाकर्त्याचा २० वर्षीय मुलगा हा घरात झोपलेला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या घराजवळ अश्रुधुराचा गॅस सोडला. त्यामुळे मुलाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला व तो घराबाहेर आला. तेवढ्यात पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात मुलाच्या फुफ्फुसात गोळी अडकून तो गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रियेची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र याचिकाकर्त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन मुलाचा जीव वाचविण्यासाठी शासनाच्या वतीने उपचार पुरविण्याची विनंती केली. तसेच नागरिकांवर गोळीबार करणाऱ्या सिटीचौक पोलिस ठाण्याच्या तत्कालीन निरीक्षकांसह इतरांवर गुन्हे दाखल करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
\Bतपासणी अभिप्राय मागवला
\Bनुकत्याच झालेल्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्याचे वकील काझी यांनी जखमीच्या फुफ्फुसात गोळी अडकल्याने कठोर परिश्रमांचे कोणतेही काम करण्यास असमर्थ आहे. तो एक निरोगी आयुष्य जगू शकत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर खंडपीठाने घाटीच्या आधिष्ठता यांना त्या मुलाला होणाऱ्या त्रासाबद्दल समिती गठीत करुन तपासणी करून त्याचा अभिप्राय एका महिन्यात देण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत.