मूक मोर्चाच्या माध्यमातून एकजुटीचे दर्शनाबरोबर शक्तीप्रदर्शन करणारा तालुकास्तरावरील मराठा समाजाचा मोर्चा सोमवारी उमरगा येथे काढण्यात आला. या मोर्चात उमाकांत माने, हर्षवर्धन चालुक्य, किरण गायकवाड, सुरेश बिराजदार, चंद्रशेखर पवार या राजकीय नेतेमंडळीसह मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत अद्यापही शासनाकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे मराठा समाजामध्ये अस्वस्थता आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, ही मराठा समाजाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
जिल्हास्तरानंतर आता तालुकास्तरावर मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येत आहेत. याचा एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबनंतर अशा प्रकारचा मोर्चा उमरगा येथे काढण्यात आला होता. कोपर्डी प्रकरणातील निकाल जलदगतीने झाला पाहिजे, मराठा समाजाला तात्काळ आरक्षण जाहीर करून त्याची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळावा, अॅट्रासिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याने या कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी, शासकीय कामासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला विनाविलंब देण्यात यावा अशा प्रकारच्या मागण्या असलेले एक निवेदन मोर्चेकऱ्यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी नीलेश श्रींगी यांना देण्यात आले.
उमरगा शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या दत्त मंदिरापासून मोर्चास सुरुवात करण्यात आली. तर शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर मोर्चाचा समारोप झाला. मोर्चानिमित्त शहरात सर्व ठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले होते. यामुळे उमरगा शहर भगवेमय झाले होते. मोर्चानंतर रस्त्यावर पडलेला कचरा स्वंयसेवकांनी गोळा करीत मोर्च्याचा मार्ग स्वच्छ केला.