म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून राज्य खड्डेमुक्त करण्यात येणार असल्याची
घोषणा केली होती. त्या प्रमाणे राज्य सरकारचा हा कार्यक्रम उस्मानाबाद जिल्ह्यात यशस्वीरीत्या राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डेमुक्तीचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून ९८ टक्के इतके काम पूर्ण झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल कुलकर्णी यांनी दिली. यावेळी कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात उपस्थित होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्य महामार्गाची एकूण लांबी सुमारे ९७८ किलोमीटर इतकी आहे. यापैकी ६९२ किलो मीटर रस्त्यावरील खड्डे भरणे अपेक्षित होते. यापैकी ६६४ किलो मीटर रस्त्यावरील म्हणजेच सुमारे
९८ टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. तर, जिल्ह्यातील एकूण प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या १३४३ किलो मीटरपैकी ६४८ किलो मीटर रस्त्यावरील खड्डे
भरणे अपेक्षित होते. हे काही जवळपास ८० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. उर्वरित काम २२ डिसेंबर अखेर पूर्ण होईल.
उस्मानाबाद विभागाच्या अंतर्गत उस्मानाबाद, लोहारा, उमरगा व तुळजापूर हे चार तालुके येतात. या विभागातील राज्य महामार्गातील खड्डे भरण्याचे काम
सुमारे ९५ टक्के तर प्रमुख जिल्हा मार्गाचे काम सुमारे ९० टक्के इतके झाले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात यांनी दिली. आता जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख रस्ते खड्डेमुक्त झाल्याने वाहनचालकांना तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. शिवाय या रस्त्यावर झालेले खड्डे तात्काळ दुरुस्त करण्याचे काम दोन वर्षापर्यंत संबंधित ठेकेदाराला करावे लागणार आहे. त्यामुळे रस्त्याची निगा चांगली राखली जाण्यास
मदत होणार असल्याचे अनिल कुलकर्णी यांनी यानिमित्ताने बोलताना स्पष्ट केले.
निधीची चणचण असल्याची ओरड कायम
जिल्ह्यातील राज्य महामार्गावरील तसेच जिल्हा प्रमुख मार्गाचे खड्डे भरण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील काम पूर्णत्वाकडे आले असले तरी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेले रस्ते शिवाय शहरातील नगरपालिकेच्या देखरेखीखाली असलेले रस्ते मात्र खड्डेमुक्त करण्यात आलेले नाहीत. निधीची चणचण ही त्यांची ओरड कायमच आहे.