म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद येथील स्वाधार महिला केंद्रात २ महिला गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत सिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी हे आधार केंद्र तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. उस्मानाबाद येथील स्वाधार केंद्रातील सहा पीडित महिलांना लातूर येथील शासकीय स्वाधार केंद्रात पाठवून त्यांचे पुनर्वसन करावे असे आदेश दिले आहेत. त्याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यात पीडित महिलांना आधार मिळावा यासाठी चांगली संस्था नेमावी असे सांगत बदामे यांच्या संस्थेतील अनैतिक प्रकाराची माहिती केंद्र सरकारला कळवली आहे.
‘मटा’ने स्वाधार केंद्रातील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आणले होते.
उस्मानाबाद येथील एमआयडीसी येथील स्वाधार केंद्राच्या परिसरात कंडोम व दारुच्या बाटल्या आढळल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्याशिवाय या केंद्रातील २ महिला ४ महिन्याच्या गर्भवती असल्याचे स्त्री रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत उघड झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे व पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दाखल तपास व कारवाईस सुरुवात केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली असून तिच्या अहवालाची वाट न पाहता तात्काळ हे केंद्र बंद कंरण्याचे आदेश दिले आहेत.
स्वाधार केंद्रातील निवास, स्वच्छता गृहची दुरावस्था झाली असून ही संस्था श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ लातूर येथील आहे. भागवत बदामे या संस्थेचे अध्यक्ष असून त्यांच्या राज्यात अनेक ठिकाणी संस्था आहेत. उस्मानाबाद येथील प्रकारामुळे त्यांच्या संपूर्ण संस्थांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सखोल चौकशीची मागणी होत आहे.
चौकशीची गरज
स्वाधार केंद्रात अत्याचारातील पीडित मुलींना व महिलांना न्यायालयाच्या आदेशाने सुरक्षित गृह म्हणून ठेवले जाते. मात्र, या केंद्रांतून मुली बाहेर कशा जातात याबाबत राज्यातील सर्व महिला स्वाधार केंद्राची चौकशी होणे गरजेचे आहे.