म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उद्योगांचा अभाव असलेल्या परभणी जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न बिकट झाला आहे. पाणी टंचाई, खडतर रस्ते आणि ग्रामीण भागाचे मागासलेपण कायम आहे. तरीसुद्धा पाच वर्षांत परभणी जिल्ह्यातील आमदारांचा विधानसभेत आवाज घुमला नाही. औरंगाबाद महसूल विभागात सर्वात कमी प्रश्न परभणी जिल्ह्यातील आमदारांनी विचारले. हे प्रश्न आहेत अवघे ४९!
परभणी जिल्ह्यात परभणी शहर, जिंतूर, पाथरी आणि गंगाखेड हे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यातील मानव विकासाची स्थिती मध्यम आहे मात्र, विधानसभेतही जिल्ह्यातील प्रश्नांवर आवाज उठला नाही. २०१४ ते १८ या काळातील १३ अधिवेशने (एकूण दिवस १९८), त्यातील चर्चा, लक्षवेधी सूचना आणि तारांकित प्रश्न, ज्यात आमदारांच्या नावाचा पहिला उल्लेख आहे. त्यानुसार 'संपर्क' संस्थेने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात आरोग्य, शिक्षण, पाणी, शेती, बेरोजगारी, बालक, महिला या घटकांवरील प्रश्नांचा आढावा घेतला. जिल्ह्यातून एकूण ४९ प्रश्न विचारले गेले. आमदार राहुल पाटील यांनी सर्वाधिक २४ प्रश्न विचारले. त्यात पाणी आणि शेतीचे प्रश्न अधिक आहेत. शिक्षणाबाबत एकही प्रश्न मांडला गेला नाही. जिंतूर आणि सेलू तालुक्यात निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार पुरविण्यात आल्याबाबतचा आमदार विजय भांबळे यांचा तारांकित प्रश्न २०१५ च्या पावसाळी अधिवेशनात होता. धोरणविषयक व महिला समस्यांशी संबंधित एकही प्रश्न मांडला गेला नाही. घोटाळे-गैरव्यवहारविषयक एकूण १३ प्रश्न मांडले गेले. सर्वात कमी फक्त दोन प्रश्न मधुसूदन केंद्रे यांनी विचारले. औरंगाबाद महसूल विभागातील आठ जिल्ह्यांतून विचारल्या गेलेल्या एकूण प्रश्नांत सर्वात कमी प्रश्न परभणी जिल्ह्यातून विचारले गेले. श्रीक्षेत्र माहूर येथील पांडव लेण्याची दुरवस्था, विहिरींचे प्रलंबित प्रकल्प, अखर्चित निधी, खंडित विद्युतपुरवठा, पाणीटंचाई, बोगस कर्जवाटप, रेशीम उत्पादक शेतकर्यांचे थकित अनुदान या विषयांवरही प्रश्न होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे प्रश्न रखडले आहेत. पाणीप्रश्न भेडसावत आहे. रोजगारासाठी मोठे उद्योग उभारण्याची तरुणांची मागणी आहे. मात्र, या प्रकल्पांसाठी पाठपुरावा केला गेला नाही.
\Bमतदारांची निरीक्षणे\B
'संपर्क' संस्थेने मतदारांशी केलेल्या चर्चेनुसार आमदारांबाबत वेगवेगळे निष्कर्ष समोर आले. शिवसेनेचे परभणी शहराचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पिंगलगढ नाल्याची दुरुस्ती करून लोकांची गैरसोय दूर केली. आरोग्य शिबिरे घेऊन तज्ज्ञांकडून लोकांना मोफत उपचार मिळवून दिले; तसेच पाणीप्रश्नाचा पाठपुरावा केला. जिंतूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय भांबळे यांचे विशेष काम नाही. पाथरीचे शिवसेनेचे आमदार मोहन फड यांनी आरोग्य सुविधा दिल्या आहेत. गंगाखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मधुसूदन केंद्रे यांनी 'गंगाखेड शुगर्स'चा ३२८ कोटींचा घोटाळा उघडकीस आणला; तसेच पीकविमा, दुष्काळामुळे पिकांच्या नुकसानीवर काम केले.
\Bसर्वाधिक उपस्थिती, सर्वात कमी प्रश्न\B
विधानसभेच्या अधिवेशनात सर्वाधिक उपस्थिती मधुसुदन केंद्रे (८२ टक्के) यांची आहे. मात्र, सर्वात कमी म्हणजे फक्त दोन प्रश्न विचारले आहेत. डॉ. राहुल पाटील (७७ टक्के), विजय भांबळे (६४ टक्के) आणि मोहन फड (७१ टक्के) यांची समाधानकारक उपस्थिती आहे.