म. टा. प्रतिनिधी, पैठण
जायकवाडी धरणातील मासेमारी बंदीच्या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली आहे, अशी माहिती कहार पंचकमिटीचे अध्यक्ष, नगरसेवक बजरंग लिंबोरे यांनी दिली.
जायकवाडी धरण परिसराला १९८६ मध्ये पक्षी अभयारण्य घोषित करण्यात आले. तेव्हापासून जायकवाडी जलाशयात मासेमारीवर बंदी आहे. या जलाशयात मासेमारी करण्यासाठी औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील २७ मच्छिमार सहकारी संस्थांची नोंदणी करण्यात आली असून या संस्थांचे १६०३ सदस्य आहेत. मात्र, मासेमारी बंदीमुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, हे नागरिक दारिद्री जीवन जगत आहेत, असे नगरसेवक लिंबोरे यांनी सांगितले. तत्कालीन खासदार तुकाराम रेंगे व आमदार संजय वाघचौरे यांनी अनुक्रमे लोकसभा व विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करूनही बंदी उठलेली नाही. यामुळे हा याचिका सादर केल्याचे सांगितले. या याचिकेत अॅड. बी. एल. सगर किल्लारीकर हे काम पाहत आहेत.