म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत बुधवारी संपली. मराठवाड्यात १८ हजार ६३९ जागांसाठी नऊ हजार ६२६ अर्ज आलेले आहेत.
पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रिया ३० मेपासून सुरू झाली होती. प्रवेशाचे वेळापत्रक दोन वेळा बदलत मुदतवाढ देण्यात आली. सुरुवातीला १८ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावयाचे होते. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वेळेत न मिळाल्याने आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नसल्याने २६ जून आणि पुढे तीन जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. बुधवारी मुदत संपताना मुदतवाढ देण्यात मिळणार की, नाही याबाबत साशंकता असल्याने पॉलिटेक्निक कॉलेजांमध्ये अर्ज निश्चितीसाठी गर्दी केली होती. प्रथम वर्षासह थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाची प्रक्रियाही याचदरम्यान झाली. मराठवाड्यात यंदा नऊ हजार ६२६ विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चितीची प्रक्रिया पूर्ण केली. नऊ हजार १३ जागा अर्ज निश्चितीनंतर रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज निश्चितीच्या प्रक्रियेनंतर प्रवेशाच्या फेरीची प्रक्रिया आठ जुलैनंतर सुरू होणार आहे. मागील वर्षी मराठवाड्यात १९ हजार ४४५ जागांपैकी १२ हजार ४४५ जागा रिक्त होत्या.
\Bगुणवत्ता यादी आज\B
वेळापत्रकाला दोनवेळा मुदतवाढ देण्यात आल्याने विद्यार्थी, पालकांचे प्रक्रियेतील पुढच्या प्रक्रियेकडे लक्ष लागले होते. नव्या वेळापत्रकानुसार चार जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. गुरुवारी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगइन आयडीवर पहायला मिळणार आहे. गुणवत्ता यादीतून विद्यार्थ्यांना आपला राज्यस्तरावरील गुणवत्ता क्रमांक समजणार आहे. यादीतील आपल्या नावाबाबत किंवा इतर आक्षेप असेल तर, पाच व सहा जुलै रोजी आक्षेप नोंदविता येतील. त्यानंतर आठ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
\Bशासकीय तंत्रनिकेतनला मागणी अधिक\B
तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांच्या संस्थांमध्ये शासकीय तंत्रनिकेतन संस्थांच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मराठवाड्यात दहा पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. त्यात सर्वाधिक अर्ज हे औरंगाबाद, जालना, अंबड अशा संस्थांमधून असल्याचे सूत्रांनी सांगितले. औरंगाबाद शासकीय तंत्रनिकेतनमधून एक हजार २०० विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चितीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे येथील विविध शाखांसाठी स्पर्धा अधिक असणार आहे.
\B'कट ऑफ'कडे विद्यार्थी पालकांचे लक्ष\B
राज्य मंडळाचा दहावीचा निकाल यंदा घसरला. निकालात घसरण झाली असली तरी प्रवेशासाठी चुरस आहे ती शासकीय संस्थांमध्ये. त्यामुळे कट ऑफ काय असेल याबाबत पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. मागील वर्षी शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबादमध्ये मेकॅनिकल, सिव्हिल या मूलभूत शाखांना खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ ८९ टक्क्यांपर्यंत होता. या कॉलेजमध्ये दोन शिप्टमध्ये तीन शाखांमध्ये प्रवेश असल्याने विद्यार्थी, पालकांचे तिकडेही लक्ष असते.
\Bमराठवाड्यातील स्थिती\B
संस्था............ ६१
प्रवेश क्षमता....१८६३९
अर्ज...............९६२६
औरंगाबाद जिल्ह्यातील पॉलिटेक्निक :११
प्रवेश क्षमता : ३८७०
अर्ज : ४०००