म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळात अनेक सेवांचे खासगीकरण करण्यात आले आहे. हे धोरण 'एसटी'साठी घातक ठरणार आहे. यामुळे 'एसटी'चे होणारे कधीही भरून निघू शकत नसल्याचे भारतीय मजदूर संघ प्रणित भारतीय परिवहन मजदूर महासंघ संलग्नित महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनचे अध्यक्ष शैलेश विश्वकर्मा यांनी सांगितले.
सिडको येथे एका मंगल कार्यालयात भारतीय मजदूर संघ, भारतीय परिवहन मजदूर महासंघ संलग्नीत महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनचे रविवारी (२२ सप्टेंबर) त्रैवार्षिक अधिवेशन घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी म्हाडाचे सभापती संजय केनेकर यांच्यासह भारतीय मजदूर संघाचे श्रीपाद कुटासकर, वेणू गोपाल, रमेश चौधरी, सुधाकर पालोदकर, रवींद्र हिमंते, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनचे मुख्य सचिव राजू भालेराव यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
या अधिवेशनात राजू भालेराव यांनी संस्थेच्या कार्याचा अहवाल सादर केला. या अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी बोलताना, शैलेश विश्वकर्मा यांनी सांगितले की, 'एसटी' महामंडळ खूप नाजूक परिस्थितीतून जात आहे. प्रशासनाकडून कामगार संघटना मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. महामंडळाचे प्रशासन 'एसटी' विभागातील विविध सेवांचे खाजगीकरण करीत आहे. याचा फटका आगामी काळात कर्मचाऱ्यांसह 'एसटी'ची सेवा घेणाऱ्यांनाही बसण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात 'एसटी'ची व्यवस्था लोकभावना जाणाऱ्या आणि सर्व सामान्यांची गरज पूर्ण करणाऱ्यांकडे द्यावी. जेणेकरून या सेवेचा लाभ समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोचण्यास मदत होईल.'
अधिवेशनातील ठराव
- २०१६-२०२०चा कामगार करार त्वरित पूर्ण करावा
- एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे
- राज्य परिवहन कामगारांची गळचेपी करणारी परिपत्रके त्वरित रद्द करण्यात यावीत
- महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी अद्ययावत विश्रामगृहे व स्वच्छतागृहे सुरू करावी
- बसला लागणाऱ्या यांत्रिक साहित्याचा मागणीनुसार पुरवठा करण्यात यावा
- कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर आकसाने दाखल केलेले खडले त्वरित मागे घ्यावेत