\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
\Bनिसर्ग वादळाने जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद शाळांचे नुकसान झाले आहे. या खोल्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी दिले.
जिल्हा परिषद शिक्षण समितीची मासिक सभा शुक्रवारी ऑनलाइन पार पडली. तीन जून रोजी झालेल्या वादळाने जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद शाळांचे नुकसान झाले आहे. अशा ४६ शाळांची तातडीने दुरुस्ती करावी, असे आदेश गलांडे यांनी दिले.
करोना उपाययोजनेसाठी जिल्ह्यातील किती शाळा क्वारंटाइन केंद्र म्हणून वापरण्यात येत आहेत, याचा आढावा त्यांनी केला. या शाळा सॅनिटाइज करूनच वापर करावा, अशी मागणी पुष्पा काळे यांनी केली. प्रभाकर पवार, बळीराम भुमरे यांनी मुख्याध्यापक पदोन्नतीचा मुद्दा लावून धरला. यावर सामान्य प्रशासन विभागाकडून तारीख घेऊन आठ दिवसांत प्रश्न मार्गी लावावा, अशी सूचना सभापतींनी केली.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी विद्यार्थी व पालक यांची करोनाबाबत जनजागृती करावी, शाळेच्या दर्शनी भागात सूचनाफलक लावण्यात यावा, अशी मागणी पूनम राजपूत यांनी केली. बैठकीस पुष्पा काळे, पूनम राजपूत, बबन कुंडारे, सीमा गव्हाणे, प्रभाकर पवार, बळीराम भुमरे, कल्याण चव्हाण, शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल, उपशिक्षणाधिकारी आश्विनी लाठकर यांच्यासह गटशिक्षणाधिकारी सहभागी झाले होते.