म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'देशात कष्टकऱ्यांच्या कष्टाला दाम मिळत नाही. असंघटित कामगारांची स्फोटक परिस्थिती निर्माण झाली. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. विषमता पराकोटीला गेली. त्यामुळेच कष्टकऱ्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे,' अशी माहिती हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष बाबा आढाव यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
आढाव म्हणाले, 'हमाल, मापाडी, कष्टकरी, वृद्धांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. माथाडी हमाल इतर श्रमजीवी कष्टकरी, अंगमेहनती कायदा १९६९मध्ये करण्यात आला. या कायद्याला पन्नास वर्ष पूर्ण होत असताना कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. या विरोधात कष्टकऱ्यांचा जाहीरनामा करण्याच्या उद्देशाने राज्यव्यापी दौरा सुरू करण्यात आला आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करतानाच सरकारला पर्यायही देण्यात येतील,' असेही आढाव यांनी स्पष्ट केले.
'खासगीकरणाच्या धोरणानंतर देशात प्रचंड विषमता निर्माण झाली. संघटित कामगार कमी होऊन, असंघटित कामगारांची संख्या पन्नास कोटीवर पोहचली आहे. कष्टाचे दाम मिळत नाही. दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग दिला जातो. असंघटित कामगारांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मारा अशी झाली आहे. कायदा प्रभावीपणे राबवावा ही साधी मागणी सरकार पूर्ण करत नाही. योजना राबवण्याएवेजी योजनांचे नावे बदलून त्या पुन्हा जाहीर केल्या जात आहेत,' असा आरोप त्यांनी केला.