म. टा. प्रतिनिधी, कन्नड
निसर्ग चक्रीवादळामुळे कन्नड तालुक्यात महसूल प्रशासन व महावितरणच्या सतर्कतेमुळे तसेच चक्री वादळाची पूर्वसूचना दिल्याने नुकसान टाळता आल्याची माहिती तहसीलदार संजय वारकड यांनी सांगितले. तालुक्यात तीन ठिकाणी घरांची पडझड झाली असून वित्त व जीवितहानी टळली आहे. या निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्यात जोरदार वाऱ्यासह ३१ मिलीमिटर पावसाची नोंद घेण्यात आली.
निसर्ग चक्रीवादळ कन्नड तालुक्याच्या लगतपासून मार्गक्रमण केल्याने नागद परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. परंतु, रात्रीची वेळ असल्याने व या भागात प्रभाव कमी असल्याने निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून काही भाग बचावला आहे. तालुक्यात बुधवारी रात्री ११ते गुरुवारी पहाटे चार वाजेपर्यंत या वादळाचा प्रभाव दिसून आला. या दरम्यान तालुक्यातील आठ महसूल मंडळात दमदार पाऊस झाला आहे. प्रशासकडून तहसीलदार संजय वारकड यांनी प्रत्येक गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आदींना सूचना दिल्या होत्या की, नुकसान होत असेल, तर लवकर कळवावे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले होते. सद्यस्थितीमुळे तालुक्यात खरीप पेरणीला वेग येणार असून मका, तूर या पिकांच्या धूळ पेरणीस फायदा होणार आहे. बुधवारी रात्री तालुक्यात ३१ मिमी, तर दोन दिवसात पावसाची ३५.७५ मिमी नोंद घेण्यात आली आहे.
\Bमंडळनिहाय पाऊस\B
देवगाव रंगारी ३७ मिमी, चापानेर ३० मिमी, चिकलठाण २० मिमी, कन्नड ३८ मिमी, पिशोर २५ मिमी, नाचनवेल १३ मिमी, करंजखेडा ६५ मिमी, चिंचोली लिंबाजी १६ मिमी