म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'मराठवाड्यातील भयावह दुष्काळ निवारणासाठी सामाजिक चळवळ उभारण्याची गरज आहे. त्यासाठी वृक्षारोपण करा. हे एक सामाजिक दायित्व आहे,' असे आवाहन वन सचिव विकास खारगे यांनी शनिवारी केले.
औरंगाबादमध्ये वृक्ष लागवडीचे उद्दीष्टे आणि पूर्व तयारी नियोजन बैठक घेण्यासाठी खारगे यांनी बैठक घेतल्यानंतर मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तासह नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या सीईओंची जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात बैठक घेतली. बैठकीत खारगे यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि सीईओंकडून वन लागवडीबाबत पूर्वतयारी करण्याबाबत माहिती घेतली. आगामी एक जुलै २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ या दरम्यान राज्यात ३३ कोटी वृक्षलागवड करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. नदीच्या दोन्ही बाजूच्या काठावर तसेच धरणाच्या कॅचमेंट एरियात वृक्षलागवड करा,' असे आवाहन केले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी, प्रवीण श्रीवास्तव, मुख्य वनसंरक्षक पी. के. महाजन, वनसंरक्षक एन. बी. गुदगे, उपवनसंरक्षक सतीश वडस्कर, मराठवाड्यातील विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाचे वन अधिकारी उपस्थित होते.