अ‍ॅपशहर

निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरुच

म टा...

Maharashtra Times 28 Apr 2018, 5:00 am

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) निवासी डॉक्टरांचे सामुहिक रजा आंदोलन सुरुच असून, निवासींच्या आंदोलनामुळेच रुग्णालयातील सर्व नियोजित शस्त्रक्रिया रद्द करुन पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. रुग्णसेवा प्रभावीत होत असल्यामुळेच शनिवारी (२८ एप्रिल) सकाळी आठपर्यंत रुजू होण्याचा अल्टीमेट घाटी प्रशासनाच्या वतीने निवासी डॉक्टरांना देण्यात आला आहे.

अपघात विभागात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी बुधवारी (२५ एप्रिल) रात्री निवासी डॉक्टरला मारहाण, तर सहयोगी प्राध्यापकाला धक्काबुक्की करण्यात आल्यानंतर सर्व निवासी डॉक्टरांनी बुधवारी मध्यरात्रीपासून सामुहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीदेखील निवासी डॉक्टरांनी घाटी परिसरात जोरदार घोषणाबाजी केली तसेच रॅली काढली. आंदोलनाचा परिणाम म्हणूनच रुग्णालयातील सर्व नियोजित उपचार प्रक्रिया तसेच शस्त्रक्रिया पुढ ढकलण्याची वेळ आली आहे. केवळ तातडीचे व आपत्कालिन उपचार तसेच शस्त्रक्रिया शुक्रवारी करण्यात आल्या. आधीच अनेक डॉक्टर उन्हाळी सुटीवर असल्यामुळे तसेच निवासी डॉक्टरांच्या रजा आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळेच घाटी प्रशासनाकडून कारवाईचे हत्यार उपसण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच १० ते १५ निवासी डॉक्टर कामावर परतल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. रजा आंदोलन सुरुच राहिले तर मात्र रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

आमच्यातील एकही निवासी डॉक्टर कामावर परतलेला नाही, परतल्याच्या केवळ अफवा आहेत. तसेच आम्हाला रुजू होण्याबाबतचा कोणताही आदेश किंवा इशारा प्राप्त झालेला नाही. मुळात प्रत्येकवेळी प्रशासनाकडून आश्वासने दिली जातात, पण आश्वासनांची पूर्तता काही होत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूलथापांना आम्ही बळी पडणार नाही.

- डॉ. सुमेश अग्रवाल, शहराध्यक्ष, मार्ड

नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत व तातडीचे उपचार-शस्त्रक्रिया केल्या जात आहे. निवासी डॉक्टरांनी शनिवारी सकाळी आठपर्यंत रुजू व्हावे, त्यांच्या सर्व मागण्या आठ दिवसांत पूर्ण केल्या जातील. मात्र ते शनिवारी सकाळी आठपर्यंत कामावर परतले नाही तर त्यांच्यावर विभागप्रमुख कारवाई करू शकतात.

- डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

सर्व निवासी डॉक्टरांनी शनिवारी सकाळी आठपर्यंत कामावर रुजू व्हावे, असा निर्वाणीचा इशारा त्यांना देण्यात आलेला आहे. निवासी डॉक्टर रुजू झाले नाही तर मात्र त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज