म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गोदेंगाव येथील सरस्वती भुवन केंद्रावरील सामूहिक कॉपी प्रकरणातील ३२१ दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाने राखीव ठेवला आहे. विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवला असला तरी, संबंधित प्रकरणामध्ये दोषी असलेले शिक्षक, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षकांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने ११ मार्च रोजी गोंदेगाव येथील सरस्वती भुवन शाळेला भेट दिली. त्यादिवशी बीजगणितचा पेपर सुरू होता. तेव्हा सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आला. कार्बनच्या मदतीने अशा प्रकारची एकाच हस्ताक्षरातील कॉपी समोर आली. यात शंभरपेक्षा जास्त छायांकित प्रती शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने जप्त केल्या. त्यासह कॉपी मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली. संबंधित घटनेनंतर संबंधित केंद्राच्या केंद्र संचालकाची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. संबंधित प्रकारची उत्तरे देणाऱ्या अन् अशाप्रकारे मास कॉपी पुरविणाऱ्या शिक्षकाची माहिती घेण्यात आली. चौकशीनंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल मंडळाला सादर केला. त्यानंतर मंडळाकडून कारवाईची प्रक्रिया करण्यात आली. केंद्रपमुख, शिक्षकांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. दहावीच्या निकालात या प्रकरणात ३२१ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला. त्यातील या शाळेचे २५३ विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले. या विद्यार्थ्यांना चौकशी समिती समोर आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. त्यानंतर त्यांच्या निकालाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतरही संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी मंडळाकडून संस्थाचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अद्यापही या प्रकरणी कोणावर कारवाई करण्यात आलेली नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.