म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा शिवस्वराज्य बहुजन पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार आहे. स्वत: हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी (१६ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मला जनतेने लोकसभा निवडणुकीत भरभरून प्रेम दिले. आगामी काळात शिवस्वराज्य पक्षाने अन्य कुठल्यातरी राजकीय पक्षासोबत निवडणूक लढवावी, तिकीट घ्यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्या अनुषंघाने शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी सुरू होती; परंतु कार्यकर्त्यांचा संभ्रम होता, तो दूर व्हावा म्हणून आपण ही घोषणा करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आपण एखाद्या पक्षाच्या मदतीने निवडणूक लढवायला हवी असे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार प्रमुख पक्षांशी प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू होती. आज कोणताही पक्ष जनतेच्या हितासाठी लढताना दिसत नाही. तथापि, आमचा पक्ष मात्र जनतेचा विचार करतोय. त्यामुळे माझ्या पक्षाकडूनच निवडणूक लढवावी, असे निश्चित केले असून पुन्हा नव्या ताकदीने मी जनतेसमोर जायचे ठरवले आहे. मी सहा जागा लढवणार आणि त्यातील किमान चार जागी आम्ही विजय मिळवू, असा दावाही जाधव यांनी यावेळी केला.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवस्वराज्य बहुजन पक्षातील शिव या शब्दाला आक्षेप घेतला आहे. तेथे कायदेशीर लढाई सुरू असून अंतिम निर्णय होईपर्यंत पक्षाचे नाव तेच असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
स्वत: कन्नडमधूनच लढणार
कन्नड हा जाधव कुटुंबांचा पारंपारिक मतदारसंघ आहे. त्यामुळे आपण कन्नडमधूनच निवडणूक लढणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. लवकरच गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद पूर्व, पश्चिम व मध्य विधानसभेचे उमेदवार जाहीर केले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.