अ‍ॅपशहर

​ वर्तमानाचं बोट धरून पडझड लिहित राहिलो!

‘साहित्य अकादमीचा माझ्या काव्यसंग्रहाला जाहीर झालेला पुरस्कार हा कृषिमूल्य परंपरेचा सन्मान आहे. वर्तमानाचं बोट धरून इथली पडझड लिहित राहिलो,’ अशी भावुक प्रतिक्रिया प्रसिद्ध कवी श्रीकांत देशमुख यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

मनोज कुलकर्णी | Maharashtra Times 22 Dec 2017, 2:36 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shrikant deshmukh received sahitya akademi award
​ वर्तमानाचं बोट धरून पडझड लिहित राहिलो!

औरंगाबादः ‘साहित्य अकादमीचा माझ्या काव्यसंग्रहाला जाहीर झालेला पुरस्कार हा कृषिमूल्य परंपरेचा सन्मान आहे. वर्तमानाचं बोट धरून इथली पडझड लिहित राहिलो,’ अशी भावुक प्रतिक्रिया प्रसिद्ध कवी श्रीकांत देशमुख यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

देशमुख यांच्या ‘बोलावें ते आम्ही,’ या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर ‘मटा’शी बोलताना देशमुख म्हणाले, ‘कुणब्याचा मूक उदगार कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करत आलो. भूमी संस्कृतीचा पूनर्शोध घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून, कवी म्हणून इथल्या परिस्थितीचा विचार केला. इथली परंपरा महत्त्वाची. इथल्या पडझडीशी माझं नातं आहे. त्याच्या कार्यकारण भावाचा शोध घेण्याचा प्रयत्न कवितेतून केला. वर्तमानाचं बोट सोडून लेखन करताच येत नाही. ते मला जाणवलं आणि लिहिलं. आजचा सन्मानही त्या श्रमपरंपरेचा आहे,’ असा उल्लेख त्यांनी केला.

-
औरंगाबादशी नाते
-
‘आम्हा घरी तण अंधाराचे धन
डोळ्यातले पान सुकलेले
माळोदात बाप ऐकतो पुराण
बुजलेले कान काळोखाने
बळीवंत आम्ही भुईचेच दास
मातीचाच वास आंगोपांगी,’
असा कसदार पेरा आपल्या कवितेतून करणारे श्रीकांत देशमुख यांचे मूळ गाव बुलढाणा जिल्ह्यातील राहेरी आहे. त्यांचे वडील साहेबराव स्वातंत्र्यसैनिक आहेत. त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासोबत काम केले होते. श्रीकांत देशमुख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठातून एम. ए. राज्यशास्त्र केले. काही दिवस प्राध्यापकी केली. औरंगाबादमध्ये कॉलेज जीवनात दैनिक मराठवाडामध्ये त्यांनी केलेले लेखन चांगलेच गाजले. सध्या ते लातूर येथे विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था या पदावर कार्यरत आहेत.

-
देशमुख यांची साहित्य संपदा
-
- बळीवंत (कविता)
- आषाढी माती (कविता)
- बोलावें ते आम्ही (कविता)
- पडझड वाऱ्याच्या भिंती (ललित गद्य)
- महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ (वैचारिक)
- कुळवाडीभूषण शिवराय (वैचारिक)
- भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य (संपादन)
- महानोरांची कविता (संपादन)

-
दोन कविता...
-
तुझं
आता काहीही उरलेलं नाहीय
ढगही विरळ झालेत
हृदयाच्या आसपासचे
पुन्हा
कधीही येणार नाही पाऊस
की
भिजणार नाहीत पायाचे तळवे
टाचातून आरपार
घुसणार नाही हिरवी माती
की
भुवयांच्या केसात अडकणार नाही
गवतावरली सुकली धूळ
( ‘बोलावें ते आम्ही’मधून...)
-
रानशिवार तुडवत जातील
प्रजाहीन राजाचे देशीविदेशी बैल
कैफात डुलत बेमुर्वतखोर
भूमीचे नितळ तळवे
फाटताहेत खुरांनी चहूबाजूंनी
(‘बोलावें ते आम्ही’मधून...)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज