म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'एकनिष्ठ आणि प्रयत्नशील राहा निश्चितच फळ चांगले मिळेल,' असा कानमंत्र सामाजिक न्याय विभागाचे मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी भाजप कार्यकर्त्यांना गुरुवारी दिला. शासकीय आढावा बैठकीनिमित्ताने आले त्यांनी उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयास भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी संघटन मंत्री भाऊराव देशमुख, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण औटी, धनंजय कुलकर्णी, व्यंकटेश कमळू, भाजप अनुसूचित जाती विभागाचे चंद्रकांत हिवराळे, उत्तम अंभोरे, बबन नरवडे, जालिंदर शेंडगे आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी प्रारंभी मंत्र्यांसमोर शिष्यवृत्ती, वसतिगृहासह इतर प्रश्नांचा पाढा वाचला. त्यावर बोलताना डॉ. खाडे यांनी नुकतीच आढावा बैठक घेतल्याचे सांगून सामाजिक न्याय विभागासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याचे सांगितले. काही प्रश्न असेल, तर कार्यकर्त्यांनी थेट संपर्क साधवा, असे आवाहन केले. पक्ष कार्यालयातील गर्दीकडे पाहत दहा वर्षांपूर्वी असा उत्साह दिसत नसल्याचे त्यांनी नमूद केले. 'रिपाइं'तून भाजपमध्ये आलो असून आमदारकीची ही तिसरी वेळ आहे. एकनिष्ठ राहून काम करा, निश्चितच फळ मिळेल, असा कानमंत्र कार्यकर्त्यांना दिला. पक्षाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.