म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शालेय विद्यार्थी, शिक्षकांचे लक्ष लागलेली दिवाळी सुटी बुधवारपासून सुरू झाली. आता १३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू होणार आहेत.
विधानसभा निवडणुकांमुळे दिवाळीतील सुटीचे वेळापत्रक यंदा निश्चित होण्यास विलंब झाला. त्यात बदल करण्याची वेळ ही प्रशासनावर आली. बुधवारपासून दिवाळीच्या सुट्या सुरू होणार आहेत. मंगळवारी नियमित शाळा भरली. मात्र, सोमवारीच मतदानाचा दिवस असल्याने शाळांना सुटी होती. त्यामुळे मंगळवारी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती तुरळक होती. दिवाळीच्या सुटी म्हटले की, विद्यार्थ्यांचे लक्ष सुटीकडे लागलेले असते. विद्यार्थ्यांसाठी मौजमजा आणि पिकनिकसाठीची धम्माल असते. सुटीमध्ये काय करायचे याचे अनेकांचे बेत ठरलेले असतात. त्यात विधानसभा निवडणुकांमुळे प्रथमसत्र परीक्षांचे वेळापत्रकही लांबले. काही शाळांच्या सत्र परीक्षेचे वेळापत्रक सुटी लागण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंतचे होते. सुटीनंतर १३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू होणार आहेत.