म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
शहरातून जाणाऱ्या नाशिक निर्मळ राज्य रस्त्यावरील खड्डे व अवजड वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुळीपासून शहरवासियांची सुटका करण्यासाठी माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची सूचना केली. त्याची दखल घेत बांधकाम विभागाने रविवारपासून शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
शहरातून जाणारा नाशिक-औरंगाबाद महामार्ग, लाडगाव रोड पूर्णपणे खड्डेमय झाला असून खडी वाहतूक करणाऱ्या सुसाट वाहनांमुळे परिसरात धुळीचेही साम्राज्य पसरले आहे. शहरापासून काही अंतरावर सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या निर्माण कार्यासाठी खडी वाहतूक करणारी वाहनांमुळे नाशिक-औरंगाबाद महामार्ग व लाडगाव रोड अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. भरधाव वाहन व रस्तावरील खड्डे या दोन्हीपासून बचाव करताना दुचाकी चालकांना दुहेरी कसरत करावी लागत आहे. याशिवाय रस्त्यालगत असलेल्या खाद्यपदार्थ, किराणा दुकानदार, फळविक्रेते यांच्या मालाची नासाडी होत असल्यामुळे परदेशी यांनी तत्काळ खड्डे बुजवून देण्याचे सांगितले होते. त्यामुळे कंपनीने कामास सुरुवात केली आहे. तसेच धुळीचे प्रमाण कमी व्हावे म्हणून दिवसातून दोन वेळा शहरात पाणी मारण्यास सुरुवात करण्यात आली आहे.